घरदेश-विदेशयंत्रणांचे काम कोणाला घाबरवण्याचे असू नये; पंतप्रधान मोदींचा CVC, CBI ला सल्ला

यंत्रणांचे काम कोणाला घाबरवण्याचे असू नये; पंतप्रधान मोदींचा CVC, CBI ला सल्ला

Subscribe

तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवण्याचे असू नये. विनाकारण यंत्रणांबद्दल लोकांच्या मनातील भीती काढून टाकली पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मुख्य दक्षता आयोग (CVC) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांना दिला. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदमध्ये त्यांनी हे भाष्य केलं. तसंच, देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही बलवान असो, जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्याच्यावर कारवाई करताना यंत्रणांनी मागे राहता कामा नये असं मत देखील मोदींनी व्यक्त केलं.

पंतप्रधानांनी केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय जीवनातील सर्व स्तरातून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की भ्रष्टाचार लोकांचे हक्क हिरावून घेतो. सर्वांना न्याय मिळणे आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतो तसेच राष्ट्राच्या सामूहिक शक्तीवर परिणाम करतो. गेल्या ६-६ वर्षात भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असा विश्वास निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. मध्यस्थाशिवाय तसेच लाच न देता सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो असा विश्वास लोकांमधे निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. आता लोकांना वाटते की भ्रष्ट माणूस, कितीही ताकदवान असला, तो कुठेही गेला तरी त्याला सोडले जाणार नाही.

- Advertisement -

केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदेत पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या यूपीए सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. “पूर्वी, ज्याप्रकारे सरकार आणि व्यवस्था चालवली जात होती, त्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. आज भ्रष्टाचारावर हल्ला करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने सुधारणाही होत आहेत. “आज २१ व्या शतकातील भारत आधुनिक विचारसरणीसह मानवतेच्या हितासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहे. नव भारत हा नवोन्मेष, पुढाकार आणि अंमलबजावणीवर भर देत आहे. भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे हे मान्य करायला आता नवा भारत तयार नाही. त्याला आपली प्रणाली पारदर्शक, प्रक्रिया कार्यक्षम आणि प्रशासन सुरळीत हवे आहे,” असं मोदी म्हणाले.

हे सरकार नागरिकांवर अविश्वास दाखवत नाही आणि म्हणूनच, कागदपत्रांच्या पडताळणीचे अनेक स्तर काढून टाकण्यात आले आहेत. जन्म प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनासाठी जीवन प्रमाणपत्र यासारख्या अनेक सुविधा या तंत्रज्ञानाद्वारे आणि मध्यस्थांशिवाय वितरित केल्या जात आहेत. क आणि ड संवर्गाच्या भरतीमध्ये मुलाखत ही पायरीच न ठेवणे , गॅस सिलेंडर नोंदणीपासून कर भरण्यापर्यंतच्या सेवांमध्ये ऑनलाइन आणि फेसलेस अर्थात चेह्राविरहित प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे.

- Advertisement -

विश्वास आणि तंत्रज्ञानाच्या या दृष्टिकोनामुळे कार्यक्षम प्रशासन आणि व्यवसाय करणे सुलभ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. व्यवसायांसाठी परवानग्या आणि अनुपालनासंबंधी अनेक जुने नियम काढून टाकले गेले आहेत, त्याचबरोबर सध्याच्या आव्हानांना अनुसरून अनेक कडक कायदे आणले गेले आहेत असे त्यांनी नमूद केले. अनुपालनासंबंधीच्या अनेक अटी काढून टाकण्याचा उद्देश आहे. बहुतेक परवानग्या आणि अनुपालन फेसलेस केले आहेत. स्वयं-मूल्यांकन आणि स्वयं-घोषणेसारख्या प्रक्रियांना प्रोत्साहित केले जात आहे असे ते म्हणाले. GeM, सरकारी ई-मार्केटप्लेस इर्थात सरकारी ई बाजारपेठेने ई-निविदेमध्ये पारदर्शकता आणली आहे. डिजिटल नोंदी तपास सुलभ करत आहेत. त्याचप्रमाणे, पीएम गति शक्ती राष्ट्रीय महायोजना, ही निर्णय घेण्यासंबंधित अनेक अडचणी दूर करणार आहे. विश्वास आणि तंत्रज्ञानाच्या या मोहिमेत केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेसारख्या संस्था आणि अधिकाऱ्यांवर देशाचा विश्वास असणे महत्त्वपूर्ण आहे असे ते म्हणाले, “आपण नेहमीच राष्ट्र-प्रथम हे बोधवाक्य ठेवले पाहिजे आणि नेहमी जनहित आणि जनकल्याणाच्या कसोटीवर खरे उतरले पाहिजे” हे निकष पूर्ण करणाऱ्या ‘कर्मयोगी’ यांच्या पाठिशी ते नेहमीच ठाम उभे राहतील असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘प्रतिबंधात्मक दक्षते’ विषयी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, सावधगिरीने प्रतिबंधात्मक दक्षता प्राप्त केली जाऊ शकते आणि तंत्रज्ञान आणि अनुभवाद्वारे बळकट केली जाऊ शकते. तंत्रज्ञान आणि सतर्कतेसह- साधेपणा, स्पष्टता, प्रक्रियांमध्ये पारदर्शकता प्रतिबंधात्मक दक्षतेसाठी दीर्घकालीन लाभदायी ठरेल. यामुळे आपले काम सोपे होईल आणि राष्ट्राची संसाधने वाचतील, असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कोणतीही कसर सोडू नका आणि देशाला तसेच देशवासियांना फसवणाऱ्यांना सुरक्षित ठिकाण राहणार नाही याची खातरजमा करा असे आवाहन पंतप्रधानांनी अधिकाऱ्याना केले. गरीबांच्या मनातून व्यवस्थे बद्दलची भीती काढून टाका असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तांत्रिक आव्हाने आणि सायबर फसवणुकीबाबत काम करण्याचे आवाहन केले.

कायदे आणि कार्यपद्धती सुलभ करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या आवाहनाची आठवण करून देत, पंतप्रधानांनी नवीन भारताच्या मार्गात येणाऱ्या अशा प्रक्रिया काढून टाकाव्यात असे आवाहन केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेसह इतर भ्रष्टाचारविरोधी संस्थांना केले. “तुम्ही भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता अर्थात जराही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही हे नव भारताचे धोरण बळकट करण्याची गरज आहे. गरीबांना व्यवस्थेच्या जवळ आणणे आणि भ्रष्टाचारी बाहेर फेकणे ”, अशा कायद्यांची अंमलबजावणी तुम्ही करण्याची गरज आहे असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -