झी मराठी वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या’ हा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजनच नाही तर हसवण्याचे देखील काम या कार्यक्रमाद्वारे केले जाते. मात्र नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका भागात आगरी आणि कोळी समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्यात आले होते. यामुळे आगरी आणि कोळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे समाजातील विविध संघटनांनी भाऊ कदम यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर भाऊ कदम यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागितली आहे.
नेमके काय घडले?
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या भागात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ अधोक्षज भोईर यांचे विनोदी पात्र दाखवण्यात आले होते. हे नाव आगरी समाजात अतिशय मानाचे मानले जाते. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आगरी कवी मिथुन भोईर यांचे पात्र साकारुन आगरी समाजावर टीका करण्यात आली. आगरी पात्राद्वारे विनोदाची निर्मिती केल्यास काही हरकत नाही. परंतु कोणत्याही कार्यक्रमाद्वारे आगरी समाजावर टीका करण्याचा कोणाला ही अधिकार नसल्याचे अॅड भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच आमच्या समाजाचा अपमान केल्याप्रकरणी संबंधितांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. वाद अधिक पेटू नये याकरता भाऊ कदम यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. कार्यक्रमातही अशाप्रकारे जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे पत्र कार्यक्रमाच्या निर्मात्यांना देण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र निर्माते यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नसून त्यांची प्रतिक्रिया येण्याची वाट पाहत आहेत.