९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. यावर्षी साहित्या महामंडळाने संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणूक न लढवता केली आहे. दरम्यान, लेखिका अरुणा ढेरे यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवर चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी उपहासात्मक टिका केली आहे. साहित्य संमेलन हा २००० वर्षे आउटडेटेड, खर्चिक आणि टाइमपास कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले कुंडलकर?
सचिन कुंडलकर यांनी फेसबूकवर टिका केली आहे. ते म्हणतात की, ‘मराठी साहित्य संमेलनासारख्या २००० वर्षे आउटडेटेड आणि खर्चिक, टाइमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली की केस काळे करावेत, दारु सोडावी, व्यायाम सुरु करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करुन घ्याव्यात. हे म्हणजे आपले वय वाढल्याचे भयंकर लक्षण आहे. कारण, अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पाहायची सवय होती.’ त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाल तोंड फुटू शकते.
याअगोदरही कलाकारांना खडेबोल सुनावणारी पोस्ट
याअगोदरही दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी कलाकारांना खडेबोल सुनावणारी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांनी ही पोस्ट केली होती. यामध्ये विजय चव्हाण यांना ‘मामा’ बोलून नाते जोडणारे किती कलाकार त्यांच्या आजारपणात त्यांना भेटायला गेले होते?’ असा सवाल त्यांनी केला होता. शिवाय, ‘विजय चव्हाण यांना मामा बोलून नाते जोडणारे त्यांच्या आजारपणात कुठे होते’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यावर कलाकारांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले होते.
हेही वाचा – सई ताम्हणकरचा चित्रपट मोबाईलवर शूट होणार!