घरफिचर्सउन्मादी गोंगाटात राजकीय संस्कृतीची गळचेपी

उन्मादी गोंगाटात राजकीय संस्कृतीची गळचेपी

Subscribe

पोरकट कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यापेक्षा चिकित्सक, चिंतनशील आणि कृतिशील कार्यकर्ते तयार केल्यास राजकीय संस्कृतीचे निश्चितच जतन होईल. परंतु त्यापूर्वी नेत्यांनी आपल्या स्वत:मध्ये हे गुण रुजवणे गरजेचे आहे.

वय वाढते तसे केस पांढरे होतात ते अनुभव आणि शहाणपणामुळेच. हल्लीचे राजकारणी मात्र त्यास मानायला तयार नाही. पांढरे झालेले केस रंगवून काळे केले म्हणजे वाट्टेल तसे वागण्यास आपण मोकळे, असाच जणू प्रघात सध्या पडलेला दिसतो. भल्या-बुर्‍याचे भान न राखता आपल्याच उन्मादात वावरणार्‍या अशा मंडळींमुळे राजकीय संस्कृतीचा पूर्णत: र्‍हास होऊ पाहत आहे. अशाच उन्मादी गोंगाटाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार आझम खान यांनी तलाख संदर्भातील विधायकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार रमा देवी यांच्याविषयी जे काही उद्गार काढले, ते कोणत्याही सुजाण-सुसंस्कृत नागरिकाला चीड आणणारे आहेत. तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं, असं विधान आझम खान यांनी लोकसभेत केले. विशेष म्हणजे, रमादेवी त्यावेळी अध्यक्षस्थानी बसलेल्या होत्या आणि याही गोष्टीचं भान खान यांना राहिलं नाही. आझम खान यांनीच यापूर्वी अभिनेत्री व माजी खासदार जया प्रदा यांच्याविषयी देखील असेच वक्तव्य केले होते.

२००९ मध्ये जया प्रदा यांची खान यांनी ’नाचनेवाली’ अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. याच शब्दाचे मराठीत रुपांतर करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना खिजवले. काश्मिरमधील कलम ३७० रद्द झाल्याने आनंद व्यक्त करण्यासाठी महाजन हे नाशिकमध्ये मनसोक्त नाचले. ते केवळ नाचलेच नाही तर इतरही कार्यकर्त्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते. एकीकडे गोदावरी नदीच्या महापुरामुळे हजारो रहिवाशांचे संसार उघडे पडले असताना दुसरीकडे हे मंत्रीमहोदय नाचण्यात मग्न होते. पूरग्रस्तांना मदत करुन फावल्या वेळात आनंद व्यक्त केल्याचे महाजन यांनी सांगितले असले तरीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपल्या ‘नृत्यकौशल्याला’ आवर घालणेच योग्य ठरले असते. त्यांच्या नृत्याची दृकश्राव्य फित समाज माध्यमांमध्ये वार्‍यासारखी पसरली. नाशिकचे हे नृत्य पूरग्रस्त सोलापूरमध्येही जाऊन पोहचले. तेथील एका सभेत भाषण करताना अजित पवार यांनी महाजनांच्या नृत्याचा समाचार घेत त्यांना नाच्या म्हणून संबोधले. ‘नाच्या’ हा असंस्कृत शब्द आहे का हा वादाचा मुद्दा असला तरी सामान्यपणे तो खिजवण्यासाठीच वापरला जात असल्याने महाजनांचे पित्त खवळले. त्यांनी पवारांना प्रत्त्युत्तर देताना, ‘दुष्काळ पडलेला असताना आपण लोकांना काय म्हणाले? धरणात पाणी नाही मग मी काय करु.. मी तो शब्द वापरत नाही’ असा पलटवार केला. हे करताना त्यांनी अजितदादांनी यापूर्वी वापरलेला शब्द न उच्चारण्याचा शहाणपणा दाखवला. त्यातून त्यांच्यात थोडीफार प्रगल्भता शिल्लक आहे हे दिसून आले.

- Advertisement -

अजितदादांना प्रत्त्युतर देताना त्यांनी जो शब्द न उच्चारण्याची काळजी घेतली, तोच शब्द त्यांच्याच एका जवळच्या नगरसेवकाने चक्क फलकावर मोठ्या अक्षरात झळकावून महाजनानी घेतलेल्या काळजीवर पाणी फिरवले. हा फलक वाचून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची विशेषत: महिला वर्गाची मान शर्मेने खाली झुकली असेल. हा फलक कोणत्या वेळेत आणि परिस्थितीत लागला हे बघणेही महत्वपूर्ण ठरणार आहे. अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातील वादानंतर रात्रीच्या वेळी देशभरात एक मोठी दु:खद वार्ता आली. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी अखेरचा निरोप घेतल्याची. संपूर्ण देशात या बातमीने हळहळ व्यक्त होत होती. ‘भाजपेयीं’साठी तर हा एक मोठा धक्का होता. अशा गंभीर परिस्थितीचे भान न बाळगता नाशिकमध्ये चक्क महाजनांची तरफदारी करणारी आणि अजितदादांनी यापूर्वी जी शिवराळ भाषा वापरली त्याचे अनुकरण करणारी फलकबाजी करण्यात येत होती. हा निव्वळ पोरकटपणाच म्हणावा लागेल, ज्यामुळे राजकारण किती खालच्या स्तरावर गेले हे स्पष्ट झाले. शिवाय भारतीय जनता पक्षातही अश्लाघ्य उदाहरण प्रस्थापित झाले. अशी भाषा वापरणारी एक व्यक्ती नसते तर तर ती प्रवृत्ती असते. नव्हे ती पक्षात वाढलेली विकृती असते. या विकृतीचाच परिपाक म्हणून या फलकबाजीकडे बघितले जावे. या विकृतीने कळस गाठला तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या किळसवाण्या आंदोलनाने.

पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अशाच शिवराळ ‘संस्कारां’चे संक्रमण होत असल्याने वेगळी ती काय अपेक्षा करणार? पक्षाच्या एका कार्यकर्त्याने या फलकावर लघुशंका करीत त्याचा व्हिडिओ थेट समाज माध्यमांवर टाकला. असे किळसवाणे कृत्य विकृत प्रवृत्तीचा अर्क म्हणून ओळखता येईल. निषेध करण्यासाठी आंदोलनांचा आधार घेणे हे लोकशाही व्यवस्था बळकट असण्याचे लक्षण मानले जाते. परंतु असे अश्लाघ्य वर्तन हे ,लोकशाहीला मारकच ठरेल. अलीकडे फोफावलेली अशी फलकबाजी सामाजिक शांततेला बाधक ठरणारी आहे. नेत्यांवर प्रेमच जर व्यक्त करायचे असेल, तर त्यांच्या गळाभेटी घेत बसावे. फलकांमधून हे प्रेम का ऊतू जावे? शिवाय आपल्या पक्षाचा प्रचार करण्याऐवजी दुसर्‍याचा अपप्रचार करण्याचा अधिकार या फलकबहाद्दरांना दिला कोणी? मुळात विकासाच्या मुद्यांना तिलांजली देऊन नुसतीच चमकोगीरी करणारे नगरसेवक, पदाधिकारी वा कार्यकर्त्यांवर पक्षाचा वचकच राहिलेला दिसत नाही. मागे नाशिकमधील एका नगरसेविकेच्या पतीने पक्षाला न विचारता एका छोट्याशा रस्त्याला थेट खासदार संजय राऊत यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला होता. दुसरीकडे याच नगरसेविकेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे फलक लावून भाजपला आव्हान दिले होते.

- Advertisement -

भाजपमध्ये ‘महाभरती’चा शृंखला सुरू झाली तेव्हा काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने शहरभर या महाभरतीवर टीका करणारे फलक झळकवले होते. अशा प्रकारच्या फलकबाजीतून पक्षाचा प्रचार नव्हे अपप्रचारच होणार आहे, ही बाब या मंडळींच्या लेखी कोठेही दिसत नाही. विशेष म्हणजे संबंधित पक्षाचे वरिष्ठही अशा कृत्यांची गांभीर्याने दखल घेत कारवाई करीत नसल्याने असे कृत्य करणारे फोफावतात. अशा मस्तावलेल्या धेंडांच्या उन्मादी गोंगाटाला वेळीच लगाम न घातल्यास राजकीय संस्कृतीची र्‍हास झालाच म्हणून समजा. म्हणूनच पोरकट कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यापेक्षा चिकित्सक, चिंतनशील आणि कृतिशील कार्यकर्ते तयार केल्यास राजकीय संस्कृतीचे निश्चितच जतन होईल. परंतु त्यापूर्वी नेत्यांनी आपल्या स्वत:मध्ये हे गुण रुजवणे गरजेचे आहे.

उन्मादी गोंगाटात राजकीय संस्कृतीची गळचेपी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -