घरफिचर्ससशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग

सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग

Subscribe

भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) बंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात झाला. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते.

भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) बंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात झाला. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतिकारी वाङ्मयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी. ए. झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. संघटितरीत्या कार्य करणार्‍या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या.

पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षक सज्जांतून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बॉम्ब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. त्यांच्यावर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. भगतसिंगांना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०) पण पुढे खास न्यायाधीकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ ऑक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव उर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -