घरफिचर्सपाकिस्तानकडून धोक्याची घंटा!

पाकिस्तानकडून धोक्याची घंटा!

Subscribe

एकीकडे करोना व्हायरसचे संकटाने सर्व माध्यमे व्यापली असतानाच पाकिस्तानकडून काही दहशतवाद्यांना सोडण्याचे षड्यंत्र आहे. करोनाच्या गदारोळामध्ये त्याची पुसटशी बातमीही येणार नाही आणि त्याची चर्चाही होणार नाही ही त्यांची अटकळ खरी ठरली आहे. अफगाणिस्तानमधील करारामध्ये तालिबानांना महत्त्वाचे स्थान अमेरिकेकडून पदरात पाडून घेतल्यावर अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचे रंग प्रकट होत आहेत. सरकारने आपले तुरूंगात डांबलेले सदस्य विनाअट सोडावेत म्हणून तालिबान आग्रह धरत आहेत. पाकिस्तानातही एका महत्त्वाच्या दहशतवाद्याची तुरुंगातून सुटका होण्याच्या मार्गावर आहे. मार्गावर अशासाठी म्हटले की न्यायालयाने २ एप्रिल २०२० रोजी त्याच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला आहे. परंतु सदा सजग असलेल्या भारतीय सूत्रांनी तसेच अमेरिकन सूत्रांनी ही घटना नेमकी टिपली आहे. त्या दहशतवाद्याची तुरूंगातून सुटका करण्याबाबत अमेरिकेने तंबी भरली असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे तो दहशतवादी अजून तुरूंगातच आहे. हा दहशतवादी तुरूंगात बसून धमक्या देऊ शकतो इतकेच नव्हे तर आपल्या धमक्या प्रत्यक्षात उतरवू शकतो. त्याच्या धमक्या म्हणजे साध्यासुध्या माणसाला दिल्या जाणार्‍या खंडणीच्या धमक्या नव्हेत. तो आत बसून दहशतवादी हल्ले घडवून आणतो. आणि अगदी सत्ताधीश मुशर्रफनाही त्याने धमक्या दिल्या आणि त्या वास्तवात उतरवून दाखवल्या आणि तरीही पाकिस्तानचे सर्वसत्ताधीश मुशर्रफ त्याचे काहीही करू शकले नाहीत.

२६/११ च्या हल्ल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि आपल्या माध्यमांनी त्यांच्या आचारसंहितेनुसार तिला विशेष प्रसिद्धी दिली नव्हती. तरीही झिरपून झिरपून बातम्या बाहेर येतच होत्या. या व्यक्तीने पाकिस्तानच्या तुरूंगात बसून तीन कॉल लावले. तिन्ही फोनसाठी वेगवेगळे सिमकार्ड वापरण्यात आले होते. पहिला होता भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांना. फोन करणार्‍याने मुखर्जींना सांगितले होते की मी पाकिस्तानचा अध्यक्ष आसिफ अली झरदारी बोलत आहे. मग त्याने आसिफ अली झरदारी आणि लष्करप्रमुख अशफाक परवेझ कयानी यांना फोन लावून मी प्रणब मुखर्जी बोलत आहे अशी बतावणी केली. दोन्ही देशातील या उच्च पदस्थ व्यक्तींना फोन लावणे सोपे नसते. अशा प्रकारच्या संभाषणासाठी विशिष्ट फोन नंबर वापरले जातात. त्या फोन नंबरवरच संपर्क केला जातो. हे फोन नंबर सरसकट कोणाकडे दिले जात नाहीत. तात्पर्य – पाकिस्तानच्या तुरूंगात बसलेल्या या व्यक्तीकडे हे फोन नंबर कोणी पुरवले होते हे कोडे आहे. प्रणब मुखर्जींचा हा अतिगुप्त नंबर ज्या मंत्र्याला माहिती होता तो आता दिवंगत आहे. झरदारी वा कयानींचे नंबर कसे मिळाले असतील ह्याविषयी तर्क अपुरे पडतात. झरदारींच्या नजिकच्या एका व्यक्तीने सांगितले की प्रोटोकोलनुसार आवश्यक ती सर्व बंधने वा अडसर पार करूनच तो कॉल झरदारी ह्यांच्यापर्यंत पोचला होता. हे वाचून तर बुचकळ्यात पडायला होते. कारण ह्याचा अर्थ असा आहे की झरदारींच्या मिलिटरी सेक्रेटरीने प्रथम कॉल घेतला व खातरजमा करून तो झरदारींकडे दिला होता. झरदारींप्रमाणेच कयानी ह्यांना देखील असाच फोन लावण्यात आला होता. झरदारी व कयानी यांना लावण्यात आलेल्या फोननुसार त्या दोघांना प्रणब मुखर्जींनी म्हणे जोरदार धमक्या दिल्या होत्या तर मुखर्जींना आलेल्या झरदारींच्या फोनमध्येही पाकिस्तानने भारताला दिलेल्या धमक्याच मुखर्जींना ऐकाव्या लागल्या होत्या.

- Advertisement -

अशा प्रकारचे फोन आले असल्याचा बातमीचा अधिकृत इन्कार ह्या तिघांपैकी कोणीही केलेला नाही. ६ डिसेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्राने डीजी आयएसपीआर पदस्थाचे मत प्रसिद्ध केले होते त्यानुसार असे फोन आले नसल्याचे सांगण्यात आले होते. पण ही अधिकृत घोषणा नव्हती. गंमत म्हणजे ही बातमी सर्वप्रथम फोडणारे डॉनचे पत्रकार झफर अब्बास आज त्याचे संपादक आहेत. विशेष म्हणजे आपले मत व्यक्त करणार्‍या डीजी आयएसपीआर मेजर जनरल अथर अब्बास यांचे झफर अब्बास हे बंधू होत. या फोनाफोनीच्या वार्ता अमेरिकेपर्यंत पोचल्या. कारण २६/११ नंतर धमक्यांच्या तथाकथित फोनमुळे वातावरण चांगलेच तापले होते. अमेरिकेने धावपळ करून संशयाचे ढग विरवण्यास मदत केली म्हणून अन्यथा ठिणगी पडणे अवघड नव्हते. पाकिस्तानात कोणाला बरे भारत पाकिस्तान रणभूमीमधील संघर्ष बघण्याची उत्कंठा लागली होती? तुरूंगात बसलेली ही व्यक्ती पूर्वायुष्यात कोणाचा हस्तक म्हणून काम करत असे? आणि आताही ती तसेच काम करत होती काय? आजच्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तुरूंगातून बाहेर काढण्याची कोणाला बरे घाई झाली आहे? आणि त्याचे कारण काय?

गूढ आहे ना हे सगळे? इतक्या धुक्याच्या पडद्याआड हा दहशतवादी कोण आहे? पूर्णतः निर्दोष असलेल्या कुलभूषण जाधवला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होऊ शकते; पण ही व्यक्ती मात्र भारत अमेरिका आणि ब्रिटनच्या – हो ब्रिटनच्या कारण ती व्यक्ती जन्माने ब्रिटिश आहे – नाकावर टिच्चून सोडवली जाते! पाकिस्तानच्या तुरूंगाला फिरते दरवाजे असतात. बंद कोठडी कधी बंद नसतेच – आणि तुरूंगातील व्यक्तीला अपत्येही होत असतात. मग ह्या कहाणीचे वैशिष्ट्य तरी काय आहे?

- Advertisement -

प्रश्न असा आहे की मुशर्रफ यांच्या सुटकेनंतर तर सिंध कोर्टाने ह्याही व्यक्तीला सोडावे म्हणून अशा खेळी करण्यात आल्या नव्हत्या ना? पाकिस्तानच्या राजकारणामध्ये कोणाला तरी ही दहशतवादी महत्त्वाची व्यक्ती तुरूंगातून मुक्त झालेली हवी आहे. म्हणजे आज तेथील राजकारणामध्ये त्या दहशतवाद्याचा वापर करून घ्यायचा आहे काय? हे प्रश्न गैरलागू नाहीत. कोर्टाद्वारे राजकीय खेळ खेळत आपल्याला हव्या त्या निर्णयांवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करून घेण्याची पाकिस्तानमध्ये अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून परंपरा आहे आणि तीच पुढे राबवली जात आहे हे या दोन निर्णयांमधून पुढे आले आहे. त्या महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव आहे – ओमर सईद – हो तोच ओमर सईद ज्याला भारताने IC ८१४ अपहरणप्रसंगी विमानातील प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या तुरूंगामधून अपहरणकर्त्यांच्या हवाली केले होते. तोच तो ओमर सईद ज्याने काश्मिरात अमेरिकन नागरिकांचे अपहरण केले होते. तोच तो ओमर सईद ज्याला पाकिस्तानचे लष्करशहा मुशर्रफ यांनी डॅनियल पर्लच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरूंगात डांबले होते. त्या ओमर सईदची कहाणी अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याला आज पाकिस्तान तुरुंगातून मुक्त करायला निघाला आहे. कदाचित ओमर सईद पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरतही असेल. त्यामुळेच कदाचित पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झालेली असेल. करोनाच्या संकटात या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. पण फार काळ त्याकडे कानाडोळा करता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -