घरफिचर्सशापित राजा!

शापित राजा!

Subscribe

फळांचा राजा अर्थात हापूस आंबा. रसदार असलेला हापूस आंबा आणि तोही कोकणातील हापूस आंबा म्हटलं की, आंबा खाण्याची मज्जाच निराळी असते. मात्र, करोनाच्या संकटामुळे आंबा संकटात सापडला आहे. कोकणातील आंबा शेतकरी या संकटामुळे हवालदिल झालेला आहे. आजचे हे संकट करोना विषाणूच्या महामारीमुळे जरी आले असले तरी कोकणातील हापूस आंबा हा नेहमीच शापित राहिलेला आहे. प्रत्येक सरकारची उदासीनता असेल, कोकणातील नेत्यांची निष्क्रियता असेल, कोकणातील शेतकर्‍याला खंबीरपणे साथ मिळालेली नाही. नैसर्गिक संकट असो किंवा जैविक संकट असो कोकणातील शेतकर्‍याला नेहमीच परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. आजदेखील तेच होतंय.

देशातील सर्वोत्कृष्ट असलेले कृषी विद्यापीठ कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सर्वश्रुत आहे. मात्र, कोकणातील शेतीचा आणि शेतकर्‍यांचा आधुनिक विकास का होऊ शकला नाही? हा मोठा प्रश्न आहे. कोकणातील शेतकर्‍याला आधुनिक व्यापाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सरकार आणि कोकणातील नेते नेहमीच अपयशी ठरले आहेत. कोकणाच्या नावलौकिकाचा फायदा घेऊन नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. मात्र, कोकणच्या वैभवात भर टाकायला कमी पडले. कोकणातील शेतकरी नेहमीचाच देशधडीला लागलेला आहे. कोकण रेल्वे आली मात्र कोकणातील शेतकरी आंतरराष्ट्रीय व्यापाराशी किती जोडला गेला, याचे संशोधन करावे लागेल. कोकणातील शेतकर्‍याला जाणीवपूर्वक मधल्या दलालांनी बाजूला ठेवून त्यांच्या रक्ताने सिंचलेल्या मळ्यातील फळे खाण्याचे धाडस केले आहे. भातशेती व्यवसाय असो किंवा मत्स्य व्यवसाय असो, आंबा व्यवसाय असो किंवा काजू व्यवसाय असो, इथला शेतकरी जगाच्या व्यापक व्यापारापासून दूर ठेवला गेला आहे. आज आंबा व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील शेतकरी कसा हतबल झालाय जाची जाणीव होते. निमित्त करोनाच्या संकटाचे आहे. पण कोकणातील आंबा व्यवसायावरील संकट पाचवीला पुजलेले आहे. कोकणाच्या हापूस आंब्याला जणू कायम शापित्व जडलेलं आहे.

फळांचा राजा अर्थात हापूस आंबा. रसदार असलेला हापूस आंबा आणि तोही कोकणातील हापूस आंबा म्हटलं की, आंबा खाण्याची मज्जाच निराळी असते. मात्र, करोनाच्या संकटामुळे आंबा संकटात सापडला आहे. कोकणातील आंबा शेतकरी या संकटामुळे हवालदिल झालेला आहे. आजचे हे संकट करोना विषाणूच्या महामारीमुळे जरी आले असले तरी कोकणातील हापूस आंबा हा नेहमीच शापित राहिलेला आहे. प्रत्येक सरकारची उदासीनता असेल, कोकणातील नेत्यांची निष्क्रियता असेल, कोकणातील शेतकर्‍याला खंबीरपणे साथ मिळालेली नाही. नैसर्गिक संकट असो किंवा जैविक संकट असो कोकणातील शेतकर्‍याला नेहमीच परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. आजदेखील तेच होतंय. करोनाचे महाभयंकर संकट देश आणि राज्यावर असल्यामुळे कोकणातील आंबा शेतकरी अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

आपल्या देशाचा गौरव आणि आपल्या राज्याचे वैभव म्हणजे कोकण होय. भातशेती बरोबर आंबा आणि काजूचे पीक कोकणातील शेतकरी घेतो. मात्र, कोकणातील शेतकर्‍याला प्रोत्साहन आणि संरक्षण फारच कमी वाट्याला आले. कदाचित आलेच नाही असे म्हणावे लागेल. कोकणच्या मातीत जे नेते उगवले त्यांनी कोकणावर विकासाचा प्रकाश मात्र गंभीरतेने सोडला नाही. जे सोयीने झाले तेवढेच. मात्र, या नेत्यांनी कोकणच्या शेतकर्‍यांच्या विकासाकडे, इथल्या शेतीच्या विकासासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतलेले दिसत नाहीत. सदैव मेटाकुटीला आलेला कोकणातील शेतकर्‍याच्या वाट्याला नेहमीच निराशा येते. करोनाचे संकट देखील कोकणातील शेतकर्‍याच्या पदरात निराशा, हताशपणा देऊन जाणार आहे. दोन महिन्यांपासून घरात साठवलेल्या आंब्याचे करायचे काय? असा मोठा यक्ष प्रश्न कोकणातील आंबा शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

कोकणातील हापूस आंबा हा देशाची शान आहे. पण कधी हवामानाचा परिणाम तर कधी व्यापारी शेतकर्‍यांची कोंडी करतात, अशा या-ना त्या कारणास्तव कोकणातील आंबा आणि आंबा व्यापारी नेहमीच दाबला जातो. आज करोनाच्या संकटाने कोकणातल्या आंबा शेतकर्‍याला घेरले आहे. साधारणतः कोकणातील नव्हे तर राज्यातील विविध भागातून आंबा विक्रीसाठी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये येतो. एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये त्याचा लिलाव होतो आणि थेट आंबा व्यापार्‍याकडून ग्राहकाकडे जातो.

- Advertisement -

साधारणतः फेब्रुवारीमध्ये आंब्याची चाहूल लागते. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंबा दाखल होतो. पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि देवगड येथील हापूस एपीएमसी मार्केटमध्ये कमी प्रमाणात यायला सुरुवात होते. फेब्रुवारीमध्ये रत्नागिरीचा हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होतो. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि बाणकोटमधून देखील हापूस आंबा एपीएमसीत दाखल होतो. मात्र, करोनाच्या संकटाला रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा शेतातच अडकला आहे. एपीएमसी मार्केट किंवा अन्यत्र नेण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सध्या आंब्याचा मौसम आहे. मात्र, कोकणाचा हापूस आंबा मार्केटमध्ये पोहचू शकत नाही. गुजरात आणि कर्नाटक राज्यातून येणारा आंबा हा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यात येतो. जानेवारीमध्ये कर्नाटकहून लालबाग नावाचा आंबा कमवून गेला.

सरकार आणि पुढारी यांनी घडवलेली ही एक व्यवस्था नाही का ? ज्या कोकणात अमृताच्या चवीचा हापूस आंबा पिकतो तिथे त्याला संरक्षण नाही. कोकणातच आंब्याचा व्यापार आणि विकासाला चालना का दिली जात नाही हा मोठा प्रश्न आहे. कोकणातील हापूस आंबा जर परदेशात पाठवायचा असेल तर त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी नाशिकमध्ये पाठवावा लागतो. कारण कुलिंग प्रक्रिया नाशिकमध्ये आहे.आंब्याच्या व्यवसायाची कोटी रुपयांची उलाढाल करणार्‍या कोकणाकडे सरकारने असे उदासीनतेने पाहणे म्हणजे कोकणच्या विकासाला रोखून धरल्यासारखे आहे. हापूस आंब्याचे केंद्र असलेल्या कोकणात आंब्यावरील सर्व प्रकिया करणारी यंत्रणा सरकारने करण्याची गरज आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प आहे, त्यामुळे झाडावरून उतरवलेला आंबा दोन महिने तसाच पडून आहे. यामुळे आमच्यावर मोठे संकट आले आहे, माझ्यासारखे हजारो शेतकरी सरकार यातून मार्ग काय काढतेय याची प्रतीक्षा करतोय, अशी भावना कोकणातील आंबा शेतकरी मयूर मंडलिक यांनी व्यक्त केली. नवी मुंबईत असलेल्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये प्रत्येकवर्षी सुमारे अडीच ते तीन लाख पेट्या येतात. कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा एपीएमसीत आयात होतो. परदेशात निर्यात होणार्‍या आंब्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याची मोठी मागणी आहे. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, लंडन, सिंगापूर येथे हापूस आंब्याची मोठी मागणी आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये फळ मार्केट बंद असल्याने व्यवहार ठप्प असल्याचे एपीएमसीतील आंब्याचे व्यापारी भारत देवकर यांनी सांगितले.

संपूर्ण जगाला आणि देशाला भयभीत करून सोडणार्‍या करोनामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारने करोनाला हरविण्यासाठी संपूर्ण अत्यावश्यक यंत्रणा केंद्रित केली आहे. मात्र, त्यामुळे निर्माण होत असलेल्या आर्थिक संकटाने कंबरडे मोडले आहे. करोनामुळे संपूर्ण फळ व्यापार संकटात आला आहे. फळ व्यवसायावर मोठे संकट आले आहे. कोकणातील शेतकर्‍यांचा आंबा मोठ्या प्रमाणात एपीएमसीत येतो. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या हापूस आंब्याची नेहमीच राज्यात, देशात आणि परदेशात मोठी मागणी असते. मार्केटमध्ये आंबा येण्याच्या वेळीच नेमके करोनाचे संकट येऊन ठेपले आहे. याचा मोठा फटका कोकणातील शेतकर्‍याला बसत आहे. करोनाच्या संकटामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये कोकणातील शेतकर्‍याला आपल्या आंबा उत्पादनाची मार्केटिंग करणे आव्हानाचे ठरत आहे. आंबा एपीएमसीत आणला तरी तो द्यायचा कोणाला हादेखील प्रश्न देखील लॉकडाऊन काळात निर्माण झाला आहे. मार्केट बंद असल्याने जो आंबा एपीएमसीत आला तो मोठ्या प्रमाणात तसाच आहे. कोकणातील शेतकरी आता मोठ्या संकटात अडकला आहे. त्यांना सावरण्याची गरज असून सरकारने कोकणातील शेतकर्‍यांना सावरण्याची गरज आहे. कोकणातील शेतकर्‍यांना 500 कोटी रुपयांचे पॅकेज तात्काळ जाहीर करावे आणि कोकणातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संजय पानसरे यांनी आरंभीच केली आहे. अन्यथा, कोकणातील शेतकरी देशोधडीला लागेल, आयुष्यातून उठेल, अशी भीती संजय पानसरे यांनी व्यक्त केली होती. आता करोनाच्या संकट काळात सरकार काय तोडगा काढेल हे पहावे लागेल. मायबाप सरकार, आम्हाला वाचवा, अशी आर्त हाक कोकणातील शेतकर्‍यांनी मारली आहे.

शापित राजा!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -