घरफिचर्सआधुनिक कवी केशवसुत

आधुनिक कवी केशवसुत

Subscribe

केशवसुत हे आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसुत’ या टोपणनावाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला. त्यांचे शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकर्‍या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले.

केशवसुतांनी विद्यार्थीदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले. परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्डस्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले.

- Advertisement -

नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या कविता महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्डस्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौंदर्य काव्याला प्रेरक ठरते व त्याच्या मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्वाच्या निसर्गकविता होत.

क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणार्‍या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ (१९०१) व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो. केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. अशा या महान कवीचे ७ नोव्हेंबर १९०५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -