घरफिचर्सआधुनिक कवी अनंत काणेकर

आधुनिक कवी अनंत काणेकर

Subscribe

अनंत आत्माराम काणेकर यांचा आज स्मृतिदिन. अनंत काणेकर हे आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक व वृत्तपत्रकार. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. एल.एल.बी. झाल्यावर हायकोर्टाची वकिलीची सनदही त्यांनी मिळविली. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ (१९३३) या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते संस्थापक होते. १९३५ ते १९३९ या काळात मुंबईच्या ‘चित्रा’ या साप्ताहिकाचे ते संपादक होते. १९४१ ते १९४६ पर्यंत मुंबईच्या ‘खालसा महाविद्यालयात’ ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर मुंबईच्याच ‘सिद्धार्थ महाविद्यालयात’ ते विभागप्रमुख होते. चांदरात व इतर कविता (१९३३) हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह. तत्कालीन काव्यसंकेतांना टाळून लिहिलेल्या त्यांच्या कवितांमधून प्रादेशिक लोकगीतांचे, विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेच्या प्रसन्न आविष्काराचे वैशिष्ठ्यपूर्ण दर्शन घडते.

‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेमुळे काहीशा संक्रमणकालातील प्रयोगशील मराठी रंगभूमीशी त्यांचा संबंध आला. निशिकांतची नवरी (१९३८), घरकुल (१९४१) व फांस (१९४९) ही त्यांची रुपांतरित नाटके प्रयोगशील रंगभूमीला उपकारक ठरली. धूर व इतर एकांकिका (१९४१) यात त्यांच्या एकांकिका आहेत. पिकली पाने (१९३४) हा काणेकरांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. १९२५ पासून मराठीत अवतरलेला हा नवीन गद्य साहित्यप्रकार सुस्थिर व संपन्न करण्याचे कार्य फडके-खांडेकरांबरोबरच काणेकरांनीही केले. ‘गणूकाका’ हे त्यांच्या लघुनिबंधातील कल्पित पात्र आपल्या पुराणवादी वादप्रियतेने संस्मरणीय झाले आहे. रुढ संकेतांना धक्के देणारी चतुर वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा हे त्यांच्या लघुनिबंधांचे विशेष गुण आहेत. शिंपले आणि मोती (१९३६), तुटलेले तारे (१९३८), उघड्या खिडक्या (१९४५) व विजेची वेल (१९५६) हे त्यांचे अन्य लघुनिबंधसंग्रह आहेत. धुक्यातून लालतार्‍याकडे ! (१९४०), आमची माती आमचे आकाश (१९५०), निळे डोंगर तांबडी माती (१९५७), रक्ताची फुले (१९५९), खडक कोरतात आकाश (१९६४), सोनेरी उन्हात पाचूची बेटे आणि गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९) ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके आहेत.

- Advertisement -

मराठीतील प्रवासवर्णनांना काणेकरांनी वाङ्मयीन दर्जा प्राप्त करून दिला. स्थलचित्रे, निसर्गचित्रे, व्यक्तिरेखा, प्रसंगचित्रे व समाजचित्रण यांनी संपन्न असलेल्या त्यांच्या प्रवासवर्णनांत त्यांच्या रसिक व बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. काणेकरांनी कथालेखनही केले आहे. जागत्या छाया (१९३६), मोरपिसे (१९४०), दिव्यावरती अंधेर (१९४०) व काळी मेहुणी (व इतर गोष्टी) (१९४२) हे त्यांचे कथासंग्रह. मानवी स्वभावातील वैचित्र्याचे वास्तव दर्शन त्यांच्या कथांतून घडते. रुपेरी वाळूमधील (१९४७) रुपककथा नावीन्यपूर्ण व परिणामकारक आहेत. औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे (१९५७) ते अध्यक्ष होते. १९५८ पासून ते ‘साहित्य अकादमी’ चे व ‘संगीत नाटक अकादमी’ चे सदस्य होते. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चेही ते सदस्य होते. १९६५ साली पद्मश्री होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. १९७१ मध्ये ‘सोव्हिएट देश नेहरु पारितोषिका’चे ते मानकरी ठरले. अशा या महान लेखकाचे 4 मे 1980 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -