घरफिचर्समायमहानगर ब्लॉगया करिष्म्याला काय नाव द्यायचे?

या करिष्म्याला काय नाव द्यायचे?

Subscribe

2017 साली पाच राज्यांच्या विधानसभांची रणधुमाळी सुरू झालेली होती. त्यात सर्वात आधी पंजाब व गोव्याचे मतदान झाले आणि नंतर सर्वात मोठ्या मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभेचे मतदान सुरू झाले होते. तेव्हा सोनिया गांधींची कन्या व राहुलची भगिनी प्रियांकाचा खूप बोलबाला झालेला होता. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते आणि त्यांच्यामुळेच तिथे काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे बोलले जात होते. तर त्यात आधी राहुलनी घोळ घातला आणि अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यास नकार दिला होता. पण अखेरीस तेच करावे लागले. अर्थात राहुल काँग्रेस बुडवित असल्याविषयी कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही. त्यांनी पक्षाला पुरते बुडवले, मग त्यातून त्यांचीच भगिनी प्रियांका काँग्रेसचे पुनरूज्जीवन करणार, याहीबद्दल बहुतांश काँग्रेस नेते निश्चिंत होते.

म्हणून तर अधुनमधून प्रियांकाच्या करिष्म्याच्या गोष्टी चघळल्या जात. प्रियांका आली वा तिचा कुठे स्पर्श झाला, त्यामुळे कोणते चमत्कार घडले, त्याच्या मनोरंजक गोष्टी माध्यमे अगत्याने प्रसिद्ध करीत होते. अशीच एक गोष्ट पंजाबच्या बाबतीत घडली होती. पंजाबमध्ये काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठी गांधी कुटुंबाच्या वारसांनी काहीही करण्याची गरज नव्हती. तरीही ही बाळे तिथे लुडबुडत होती. त्यातला प्रियांकाचा भाग फारसा चर्चिला गेला नव्हता. पण त्याची फळे अमरिंदर सिंगांना दीर्घकाळ भोगावी लागली. कारण त्यांनी मोठे बहुमत मिळवले आणि सरकारही स्थापन केले. पण दरम्यान प्रियांकामुळे या मुख्यमंत्र्याच्या पायात लोढणे अडकवले गेले आहे. त्याचे नाव आहे नवज्योत सिंग सिद्धू! त्यानंतर पंजाबच्या नव्या काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री विरुद्ध सिद्धू असा नवा संघर्ष पेटला. त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? त्याची मुळात गरज होती काय?

- Advertisement -

नवज्योत सिद्धू हा स्वयंभू माणूस आहे. उमेदीच्या कालखंडात क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आलेल्या सिद्धूने, पुढल्या काळात क्रिकेट समालोचनाला आरंभ केला. तेव्हा आपल्या भाषाशैली व नेमक्या मजेशीर किस्से सांगण्याने सिद्धू प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला. प्रामुख्याने कुठली तरी शेरोशायरी वा संदर्भ सुभाषिते सांगून गप्पा रंगवणार्‍या सिद्धूला एका वेगळ्या कार्यक्रमाने अधिक लोकप्रियता मिळाली. शेखर सुमन या कलाकाराने नकलाकारांचा एक स्पर्धात्मक कार्यक्रम सुरू केला. त्यात जोडीला हजरजबाबी सिद्धूलाही सहभागी करून घेतले. त्यातून वाहिन्यांवर नकलाकार व विनोदी कार्यक्रमांचे पेव फुटले. त्याचाच एक धुमारा म्हणून कपिल शर्मा शो नावारूपाला आला. सुमनच्या स्पर्धात्मक मालिकेत अजिंक्य ठरलेल्या कपील शर्माला हाताशी धरून वेगळ्या धर्तीचा कार्यक्रम सुरू झाला, यात खिदळण्याच्या ख्यातीमुळे सिद्धूचा समावेश झाला. आता तोच कार्यक्रम सिद्धूसाठी व्यवसाय झालेला आहे.

दरम्यान सिद्धू राजकारणात शिरला होता आणि भाजपतर्फे त्याने अमृतसरची जागा अनेकदा जिंकलेली होती. मात्र पंजाबात अकालींशी असलेली भाजपाची मैत्री सिद्धूला कधी रुचली नाही. परिणामी गेल्या लोकसभा मतदानात त्याला ती जागा सोडावी लागली होती. तरीही तो भाजपत होता आणि म्हणूनच त्याची राज्यसभेत नेमणूकही झाली होती. मग गेल्या जुलै महिन्यात त्याने राज्यसभा सदस्यत्वाचा व भाजपचा राजीनामा दिला. तेव्हा सिद्धू कुठल्या पक्षात जाणार, याची चर्चा रंगलेली होती. आधी त्याला आम आदमी पक्षाने आमंत्रण दिले. पण मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य नसल्याने सिद्धूने तिकडे पाठ फिरवली. मग काँग्रेसनेही त्याला आमंत्रण दिले. प्रियांकाच्या आग्रहाखातर अमरिंदर सिंग यांना हे लोढणे गळ्यात बांधून घ्यावे लागले. पक्षात बेबनाव नको म्हणून अमरिंदर गप्प बसले आणि दिल्लीत परस्पर सिद्धूला पक्षात प्रवेश मिळाला. तेव्हा किमान उपमुख्यमंत्री करणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. मात्र निवडणुका संपल्या व सत्ता आल्यावर अमरिंदर सिंग यांनी त्याला नकार दिला. तिथूनच सिद्धूची नाराजी सुरू झाली.

- Advertisement -

पण निदान आपल्याला महत्वाचे मंत्रीपद मिळावे, अशी त्याची अपेक्षा होती. तिथेही अमरिंदर यांनी नकार दिला. त्याबद्दल सिद्धू नाराज असल्याच्या बातम्या आल्या. तेव्हा अमरिंदर यांनी आपल्या अनुभवाचा आधार घेऊन या क्रिकेटपटूला नेमका शह दिला. सिद्धू आता एका राज्याचा मंत्री आहे आणि मंत्री हे पूर्ण वेळ काम असल्यानेच त्याला अन्य कुठल्या मार्गाने उत्पन्न मिळवण्याचा अधिकार उरत नाही. असे असताना कपील शर्मा शोमध्ये सिद्धूने काम करण्याचा विषय ऐरणीवर आला. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी कायदेतज्ञांचा सल्ला मागितला. सिद्धूने मंत्रीपद टिकवण्यासाठी टीव्हीचा कार्यक्रम सोडावा, किंवा मंत्रीपद सोडावे असा तिढा निर्माण झाला. सिद्धूला पक्षात घेतलाच नसता, तर ही डोकेदुखी झाली नसती. पण प्रियांकाचा करिष्मा दाखवण्यासाठी सिद्धूला काँग्रेसमध्ये घेतले गेले आणि आता ती नव्या मुख्यमंत्र्यांना डोकेदुखी झाली. पंजाब असो वा उत्तर प्रदेश असो, तिथे निवडणुका जिंकण्यात राहुल वा प्रियांकाचा कुठलाही लाभ पक्षाला मिळालेला नाही. पण जे कोणी मेहनत करतात, त्यांना डोकेदुखी निर्माण करण्यास मात्र त्यांचा हातभार मोठा लागत असतो. जे पंजाबमध्ये प्रियांकाने केले, तेच उत्तर प्रदेशातही झाले आहे. तिच्यामुळे रायबरेली वा अमेठीतल्याही सर्व जागा काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसने राहुलच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम प्रचाराची मोहीम आरंभली. किसान यात्रा काढून खाटचर्चा योजल्या. राहुलनी त्याचा पुरता बोजवारा उडवून दिला. मग राहुल वा काँग्रेसच्या हातून होणे हे कार्य शक्य नसल्याने रणनीतीकार प्रशांत किशोरने समाजवादी पक्षाशी आघाडीची बोलणी केली होती. पण तसा अधिकार त्याला कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करून आघाडीची कल्पनाच निकालात काढली गेली होती. मात्र लवकरच काँग्रेसश्रेष्ठींना आपण निकामी असल्याचा साक्षात्कार झाला व अखिलेश यादवशी बोलणी झाली. पण राहुलच्या आडमुठेपणाने त्याचाही विचका झाला. अर्ज भरण्याचे दिवस सुरू झाले, तेव्हा धावपळ करून चारशेपैकी शंभरावर जागा पदरात पाडून घेण्यात आल्या आणि त्या महान आघाडीचे श्रेय प्रियांकाला देण्यात आले. त्यानंतर अखिलेशची पत्नी डिंपल व प्रियांका एकत्रित राज्यभर प्रचार करणार व त्यांच्या करिष्म्याने मोदींचा प्रभाव धुतला जाणार, असा खूप बोलबाला झाला होता.

प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा राहुलसह प्रियांकाच्या करिष्म्याशी संगतसोबत केलेल्या समाजवादी पक्षाचीच प्रतिष्ठा धुळीस मिळाली. बाकीच्या उत्तर प्रदेशात प्रियांकाचा करिष्मा किती चालला, ते बाजूला ठेवा. अमेठी व रायबरेली या पारंपरिक भागातही प्रियांका दहातल्या दोनपेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळवून देऊ शकली नाही. प्रियांकाने नुसते फिरावे आणि जादूची कांडी फिरल्यासारखा उत्तर प्रदेश काँग्रेसच्या गोटात दाखल होणार, अशा माध्यमातून रंगवल्या जाणार्‍या गप्पांचे पितळ निकालांनी उघडे पाडले. मागल्या महिन्यात प्रियांकाची भजने-प्रवचने गाणार्‍या प्रसार माध्यमांना निकालानंतर प्रियांका आठवलेलीसुद्धा नाही. ह्या करिष्म्याने काँग्रेसला २८ जागांवरून ७ जागांवर आणून ठेवले आहे. पंजाब राज्यात आपल्याच मेहनतीने मिळवलेल्या सत्तेत प्रियांकामुळे मुख्यमंत्र्याच्या गळ्यात सिद्धू नावाचे लोढणे अडकवले गेले त्याचा परिणाम पंजाबमध्ये एकहाती सत्ता आणणार्‍या अमरिंदर सिंग हे काँग्रेस सोडेपर्यंत झाला. याला करिष्मा म्हणायचा तर मग करिष्याम्याला काय नाव द्यायचे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -