घरफिचर्ससारांशराहून गेलेलं स्मारक

राहून गेलेलं स्मारक

Subscribe

–सुनील शिरवाडकर.

रामनवमी जवळ आली की जागोजागी गीत रामायणाचे कार्यक्रम सुरु होतात. या कार्यक्रमांमध्ये गीतकार म्हणून ग.दि.माडगुळकर यांचे नाव नेहमी घेतले जातेच असं नाही. यावर्षी गदिमांचे वंशज सौमित्र माडगुळकर यांनी आवाहन केलं. गीत रामायणाच्या प्रत्येक कार्यक्रमात गदिमांच्या नावाचा उल्लेख करावा, असं त्यांचं रास्त म्हणणं आहे.

- Advertisement -

याच बरोबर गदिमांच्या स्मारकाविषयी देखील चर्चा झाली. पुण्यात त्यांचे स्मारक होणार होते, पण गेली ४६ वर्षे हे काम रखडलेले आहे. पुण्यासोबत त्यांच्या माडगुळ या गावी देखील एक स्मारक करण्याचा विचार झाला होता.

माडगुळ या गावी त्यांचं घर होतं आणि एक मळा. मळ्यात होती एक छोटीशी झोपडी. तीन बाजूंनी भिंती. दार वगैरे काही नाही. गावातील इतर घरे धाब्याची. फक्त या झोपडीवर लोखंडी पत्रे. म्हणून याचे नाव ‘बामणाचा पत्रा’.

- Advertisement -

गदिमा… म्हणजे अण्णा तसे रहात पुण्यात, पण कधी शहरातील धकाधकीच्या आयुष्याचा त्यांना कंटाळा येई. कागदावर नवीन काही उतरणं मुष्किल होई. अशावेळी त्यांना साद घाली तो हाच ‘बामणाचा पत्रा’. इतर वेळी याचा वापर गोठ्यासारखाच, पण अण्णा आले की त्याचे रुपडे बदलून जाई. सारवलेल्या जमिनीवर पांढरी शुभ्र गादी, लोड, तक्के त्या कच्च्या भिंतीवर असलेल्या खुंटीवर अण्णांचे कडक इस्त्रीचे जॅकेट, सदरे खाली बैठकीवर निरनिराळे संदर्भ ग्रंथांचे ढीग, हे अण्णांचे स्फूर्तिस्थान होते. पूर्वाभिमुख असलेल्या या झोपडीत अण्णा मग मुक्काम ठोकत. इथली सकाळ त्यांना मोहवून टाके.

ते म्हणतात, गावात चाललेल्या जात्यावरील ओव्या झोपलेल्या कवित्व शक्तीला जागे करतात. पहाटे वार्‍यावर येणारा पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो. सारे वातावरणाच असे की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठून उभ्या पिकांमधून हिंडून येतो. दवात भिजलेली जोंधळ्यांची पाने पायाला लाडिक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो, तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढर्‍या आणि बोचर्‍या रेघोट्या मारतात. हिंडून आलं की सुस्नात होऊन लेखनाच्या बैठकीवर ते येत. या मातीचाच गुण. झरझर शब्द कागदावर उतरत जातात. मधून घरचा डबा येई. बाजरीची भाकरी, लसणीची खमंग चटणी, आणि सायीचे दही. कधी जेवणासाठी घरी चक्कर असे, अण्णा म्हणतात.

आपल्या स्वतःच्या रानात पिकलेल्या शाळुची पांढरीशुभ्र भाकरी, उसातल्या पालेभाज्या, घरच्या गाई-म्हशींचं दुधदुभतं, माणदेशात पिकणार्‍या गुलाबी तांदळाचा चवदार भात आणि वाढणारी प्रत्यक्ष आई. जगातल्या कुठल्याही पक्वानाने होणार नाही एवढी तृप्ती त्या जेवणाने होते, मग पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे मला बोलावणे येते. उजव्या हाताची उशी करुन मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतील ढेकळे मला रुतत नाही, खडे टोचत नाही. झोप अगदी गाढ लागते, तर असा हा ‘बामणाचा पत्रा’. अनेक अजरामर कवितांचा, कथा, पटकथांचा जन्म इथेच झाला, तो गाव, बामणाचा पत्रा आणि गदिमा, हे अगदी एकरुप झाले होते. गदिमा गेले त्या वर्षी गावातली खंडोबाची यात्रा भरली नाही की कुस्त्यांचा फड भरला नाही.

गदिमा गेल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर प्रथमच गावी आले होते. गदिमांचे वर्गमित्र आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांनी गावकर्‍यांची इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले, तुम्ही तिकडे मुंबई, पुण्यात आण्णांचे काय स्मारक करायचे ते करा, पण आमची एक इच्छा आहे. या गावी, या वावरात अण्णांचं एक स्मारक हवं. व्यंकटेश माडगूळकरांना पण पटलं ते. त्या रात्री ते ‘बामणाच्या पत्र्या’तच झोपले. सकाळी उठले. समोर पूर्व दिशा उजळत होती आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या अण्णांचे स्मारक आकार घेत होतं.

ही सभोवार हिरवी शेते, हवेत भरुन राहिलेला ओल्या जमिनीचा, उभ्या पिकांचा गंध, मध्ये हा ‘बामणाचा पत्रा’, हाच तो दगड, ज्यावर बसून अण्णा आंघोळ करत, बापू रामोशी भल्या पहाटेच तात्पुरत्या चुलवणावर मोठा हंडाभर पाणी तापवून ठेवी. आंघोळ करतानाचे त्यांचे ते शब्द कानात घुमताहेत. ‘हर गंगे भागीरथी’, विहिरीचं पाणी त्यांच्या डोक्यावर पडलं की खरंच त्याची गंगा भागीरथी होऊन जाई. त्यांना वाटलं. शिल्पकार भाऊ साठ्यांना बोलावून घ्यावं. या आंघोळीच्या दगडाच्या जागी एखादं शिल्प त्यांच्या कल्पनेतून घडवावं. वास्तुशिल्पी माधव आचवल यांनाही बोलवावं. त्यांच्या कल्पनेतून इथे बरंच काही करावं.

आजूबाजूला कायम फुललेली बकुळ, पलाशची झाडे लावावी. त्याखाली बाके. इथेच ती अण्णांची आरामखुर्ची ठेवावी. जानेवारीच्या थंडीत अण्णा इथे येत. त्यावेळी त्यांच्या अंगावर असणारा तो कोट, इथेच खुंटीवर टांगलेला असावा. त्यांची ती लोखंडी कॉट, ती पण इथेच कोपर्‍यात राहील. अण्णांची पुस्तके, हस्तलिखितं, सगळं इथं आणू. हे गाव, इथली झाडंझुडं, पाखरं, पीकं, माणसं, हे सगळं मिळून इथेच एका लेखकाचं स्मारक बनवूया. व्यंकटेश माडगूळकरांच्या कल्पनेतलं हे स्मारक व्हायला हवं होतं, पण नाही झालं. त्याचं दुःख आहेच, पण अखेर स्मारक म्हणजे काय? कशासाठी असतं ते? ती व्यक्ती कायम स्मरणात रहावी यासाठीच ना?

आणि गदिमांचा उर्फ अण्णांचा विसर कधी पडेल हे संभवतच नाही. चैत्राची चाहुल लागली की ‘राम जन्मला गं सखे’ हे आठवणारच आहे आणि आभाळात ढग दाटून आले की ‘नाच रे मोरा’ ओठांवर येणारच आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या स्मारकाची जरुरच काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -