पिंपरी-चिंचवड शहरातील एका १२ वर्षीय मुलीचे ५० लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. तिची नऊ तासानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. १२ वर्षीय मुलीचे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या सोसायटीच्या समोरून अपहरण केले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या नऊ तासात मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली आहे. माही अवध जैन (वय – १२, राहणार क्विन्स टाऊन चिंचवड) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. तर नितीन सत्यवान गजरमळ (वय – २५ राहणार देवगाव जि. उस्मानाबाद) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (राहणार थेरगाव) असे अपहरणकर्त्यांची नावे आहेत. चिंचवड पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास माही अवध जैन ही शाळेतून आल्यानंतर तिने सुरक्षा रक्षकाकडे स्कूल बॅग देऊन पेन आणायला गेली होती. त्याच वेळी सोसायटीच्या काही अंतरावरून आरोपी नितीन आणि जितेंद्रने चारचाकी गाडीतून तिचे अपहरण केले. मुलीने आरडाओरडा केल्याने दुकानदार बाहेर आला त्याला माहिला चारचाकी गाडीत ओढत असल्याचे दिसले, मात्र तो काही करू शकला नाही. त्याने याची माहिती तातडीने पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली.
हा धक्कादायक प्रकार तुम्ही वाचलात का? – ‘माफ करा सर, मी आत्ताच माझ्या मित्राला भोसकलंय’!
खंडणीचा फोन आणि ते फसले
शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, सिसिटीव्ही फुटेज आणि शहरातील लॉज यांची झाडाझडती घेतली. मात्र काही सुगावा लागत नव्हता. बरोबर चार तासांनी अपहरण केलेल्या मुलीच्या वडिलांना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला आणि इथेच अपहरणकर्ते फसले. त्यांचा फोन पोलिसांनी ट्रेस केला होता, यामुळे त्यांचे ठिकाण समजले. मात्र एवढी रक्कम शक्य होणार नसल्याने अखेर १५ लाख रुपयांची खंडणी मान्य झाली. तोपर्यंत गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक हे ज्या ठिकाणी आरोपी होते तिथे पोहचले. हिंजवडी मधील नेरे येथील सोसायटी बाहेर अपहरण केलेली संशयित चार चाकी गाडी दिसली आणि आरोपी निष्पन्न झाले. रात्री दोनच्या सुमारास मुलीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत नाजूकरित्या हे प्रकरण हाताळले. पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक यांनी संयुक्तपणे सापळा रचला आणि दोघांना अटक करत माहीची सुखरूप सुटका केली.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार
त्यांना कुणाचेतरी अपहरण करायचे होते
दरम्यान माहीचे आई-वडील हे मोठ्या पगाराची नोकरी करतात. विशेष म्हणजे आरोपी नितीन आणि जितेंद्रला माहीचे अपहरण करायचे नव्हते, कारण ती त्यांचं लक्ष नव्हती. परंतु ते गेल्या तीन महिण्यापासून कोणाचे तरी अपहरण करायचे होते, असे त्यांनी ठरवले होते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. गेल्या दहा दिवसांपासून क्विन्स टाऊन या उच्चभ्रू सोसायटीच्या बाहेर ते चारचाकी घेऊन पाळत ठेवून होते. माही एकटीच दिसताच तिचे अपहरण केले. जी चारचाकी गाडी गुन्ह्यासाठी वापरण्यात आली आहे. ती तीन महिण्यापूर्वी आकुर्डी येथून ऑनलाइन घेतली होती. यातील एक आरोपी हा औंध येथील चित्रपट गृहात काम करत असल्याचे समोर आले आहे.