नाशिक शहरातून पालकांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. नाशिकमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. गेल्या २१ दिवसांत नाशिकमधून तब्बल २५ मुली बेपत्ता झाल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून हा आकडा ५४ वर गेला असून यात अल्पवयीन मुलींची संख्या अधिक आहे. शहर पोलिस आयुक्तालयातून ही माहिती समोर आली आहे.
प्रेमप्रकरणातून सर्वाधिक मुली बेपत्ता
नैराश्य, एकटेपणा, न्यूनगंड अशा अनेक कारणामुळे मुलं-मुली घर सोडूनही जातात. मात्र प्रेमप्रकरणातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. याबाबत पोलिस दलातूनही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यात वार्षिक परीक्षा झाल्यावर मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आला आहे.
पालक-मुलांमधला संवाद कारणीभूत?
विद्यार्थी आणि पालक यांच्यातील कमी होत जाणारा संवाद, सोशल मीडिया, मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर, भौतिक सुखाच्या मागे धावणारा तरुण वर्ग अशी अनेक कारणं यामागे असल्याचं या क्षेत्रात काम करणारे जाणकार सांगतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नातं प्रस्थापित करुन संवाद वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला चाईल्डलाईनकडून दिला जात आहे. त्याचबरोबर चाईल्ड ट्रॅफिकिंगसाठी बेपत्ता मुलींचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
बेपत्ता नागरिकांचंही प्रमाण मोठं
अल्पवयीन मुली, तरुणी यांच्या व्यतिरिक्त आजारपण, आर्थिक विवंचना, घरगुती वादाला कंटाळून घर सोडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. गेल्या पाच वर्षात शहरातून साडेसात हजार नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यातील ६ हजार ४३१ जणांना पोलिसांनी शोधून परत आणलं आहे. तरीही ११०० जणांचा काहीच पत्ता लागलेला नाही. रोजची गुन्हेगारी नियंत्रणात ठेवतानाच बेपत्तांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.