महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ खात्यात देणगीदारांच्या मदतीने ५४१.१८ कोटी रुपये जमा झाले आहेत. प्रत्यक्षात फक्त १३२.२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिली आहे. एकूण जमा झालेल्या रक्कमेच्या २४.४३ टक्के रक्कम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खर्च केले असून ७५.५७ टक्के रक्कम अशीच शिल्लक आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील मागविला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम आणि वाटपाची माहिती दिली. ३ ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ५४१.१८ कोटी रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेपैकी फक्त १३२.२५ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी २० कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून ३.८२ कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील १६ मजुराला प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे मृत व्यक्तीला ८० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ३६ जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे ८८.६४ इतके दर्शविण्यात आले आहे. जालना आणि रत्नागिरी येथे कोविड लॅबोरेटरीसाठी प्रत्येकी १.०७ कोटी देण्यात आले आहेत तर कोविड रुग्णांच्या प्लाझ्मा उपचारासाठी १६.८५ कोटी रुपये हे वैद्यकीय शिक्षण विभागास दिले गेले आहेत.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, पालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी जर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झालेली रक्कम खर्च केली गेली तर त्यांचा निधी योग्य कामात वापरल्याचा निश्चितपणे देणगीदारांना दिलासा मिळेल. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भक्कम पैसा असतानाही आर्थिक टंचाईमुळे रुग्णालयातील व्यवस्थापन हे खाजगी लोक आणि स्वयंसेवी ससंस्थेकडे मदतीसाठी विनवण्या करत आहे, ही बाब चिंतेची असल्याची खंत गलगली यांनी व्यक्त केली.
उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणू साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २८ मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री मदत निधी कोविड-१९ ची स्थापना केली आणि लोकांना पैसे देण्याचे आवाहन केले. या देणग्यांना कलम ८० (जी) अंतर्गत प्राप्तिकर माफी मिळेल. बँक खाते क्रमांक ३९२३९५९१७२० आहे. बँक कोड ००३०० आहे आणि आयएफएससी कोड एसबीआयएन ००००३०० आहे. अनेक एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि धार्मिक संस्था संकटावर मात करण्यासाठी राज्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत.
हेही वाचा – एटीएममधून का येत नाहीयेत दोन हजारच्या नोटा? हे आहे कारण