विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनीही आदोलनाला सुरूवात केली. त्यानंतर विरोध आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार राडा झाला. यावरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar criticized the Shinde group over the scuffle on the steps of the Vidhan Bhavan)
“विधीमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत होते. यावेळी विरोधकांकडून ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा देण्यात आल्या आणि हीच घोषणा सत्ताधाऱ्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आजचा प्रकार हा जाणीवपूर्वक घडवून आणला आहे. आंदोलनादरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आमच्या घोषणा दाखवण्यात आल्या. त्यातून सत्ताधाऱ्यांना त्यांची प्रतिमा मलिन झाल्याची भीती निर्माण झाली असावी. म्हणूनच ‘चारोच्या मनात चांदणं’ अशा प्रकारातून हा प्रकार झाला”, असेही अजित पवार यांनी म्हटले.
हेही वाचा – सत्ताधारी आमदारांनी शिवीगाळ केली; धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार