राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावती हिंसाचारप्रकरणी भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल बोंडे यांच्यावर चिथावणीखोर भाष्य केलं असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. तसेच आता अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप शेअर करत पुन्हा अनिल बोंडेंवर मलिकांनी निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते हि वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती असल्याचे अनिल बोंडे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावती हिंसाचार प्रकरणी एक ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कॉन्फरन्स कॉल झाला असल्याचे दिसत आहे. यामध्ये अनेक लोकं सहभागी असताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे हे संभाषण करत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह गुजरातमधील दंगलीवर भाष्य केलं आहे. भाजपचे सरकार आल्यास दंगल होत नाहीत परंतु भाजपचे सरकार नसल्यास दंगल होते असे त्यांनी म्हटलं आहे. ही दंगल मुस्लिम भागात अधिक होते याचे कारण त्यांना नेत्यांचे संरक्षण आहे. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकराच्या काळात एकही दंगल झाली नव्हती असे अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनिल बोंडे म्हणाले की, गोधरा हत्याकांडनंतर गुजरातमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही. तसेच अहमदाबादमध्ये दरवर्षी आंदोलन, हिंसाचार व्हायचा परंतु मोदी सरकार आल्यानंतर एकाही दंगलीची घटना घडली नाही. अन्यथा दंगलीसाठी अहमदाबाद प्रचलित होते. मात्र मागील १० ते १५ वर्षांपासून कोणत्याही दंगलीच्या घटना घडल्या नाहीत. जर योगी सरकारच्या काळातही पाहिले तर एकही दंगलीच्या घटनेची नोंद नाही. महाराष्ट्रातही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ५ वर्षांत एकही दंगल घडली नाही. पैशांबद्दल बोलायचे झाले तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम अवैध धंद्यात आहेत. मग ते ड्रग्ज पेडलर, वाळू माफिया, गुटखा माफिया आणि वेगळ्या प्रवाहातून पैसा येतो हा पैसा हिंसाचार आणि दंगल घडवण्यासाठी वापरण्यात येतो. विशेषता मस्जिदच्या माध्यमातून पैसा वापरण्यात येतो. असे अनिल बोंडे म्हणाले आहेत.
Listen to this BJP MLA from Amravati
झूठ बोले कौआ काटे… pic.twitter.com/7ch15MREqz— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
दरम्यान अनिल बोंडे पुढे म्हणाले की, मी भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून बोलत आहे असे नाही तर मी पाहिले आहे की, भाजपची सत्ता जेव्हा असते तेव्हा ते असल्या दंगल, हिंसाचारच्या घटनांना सामाजात प्राधान्य देत नाहीत. परंतु मविआ सरकार, काँग्रेस सरकार किंवा डाव्या सरकारच्या काळात अशा घटना घडत असतात कारण त्यांना माहिती असते की आपल्याला नेत्यांचे संरक्षण आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे संगळ्यांना माहिती आहे. कारण मागील ५ वर्षांत पाहिले तर महाराष्ट्रात संवेदनशील भागात एकही दंगल झाली नाही असे अनिल बोंडे यांनी सागितले आहे. मलिकांच्या या व्हिडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा वादंग होणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा : परमबीर सिंह, अमरावती दंगलीवर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया