महिलांच्या आरोग्याबाबत आजही तितकीशी जागृती नाही. त्यातही महिलांच्या मासिक पाळीबाबत आजही बोलले देखील जात नाही. ग्रामीण भागात तर ही परिस्थिती आणखी भयावह आहे. त्यामुळे, याबाबत राज्य सरकारतर्फे जागुरकता करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यातून महिलांच्या आरोग्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी ‘अस्मिता बाजार व अस्मिता प्लस’ या महत्त्वाकांक्षी योजनांचं उद्घाटन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले आहे.
या योजनेतून विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी राज्यात दिनदयाल अंत्योदय योजनेची उमेद या नावाने ओळख आहे. या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांचे संघटनेच्या माध्यमातून एक समुह तयार करण्यात आला आहे. या समुहामार्फत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे दैनंदिन वापरासाठी वस्तू आणि कृषी व्यवसायात लागणारे पशु खाद्य ग्रामीण भागात या गटातील महिला आणि इतर नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता बाजार ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अस्मिता बाजारचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू माफक दरात मिळाव्यात हा आहे. त्यासाठी अस्मिता अॅप मध्ये नोंदणी करावी लागणार आहे. अस्मिता बाजार अंतर्गत खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, तसेच घरगुती उपयोगी वस्तू मोबाईल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
५० हजार महिला या योजनेचा घेणार लाभ
राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळीत कशा पद्धतीने स्वच्छता राखली पाहिजे? या बाबत जनजागृती करणे. तसेच त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून ५० हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
महिला कणखर असतात. माझ्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू हा महिला आहेत. स्त्री घराचा आर्थिक कणा असला पाहिजे. त्यामुळे, अस्मिता बाजार व प्लस ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपल्या गावातील जी महिला आहेत त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी अस्मिता बाजार ही योजना आहे. तर, अस्मिता प्लस या योजनेतून महिला आणि मुली यांना सॅनिटरी नॅपकिन्स वापरून शरीराची स्वच्छता राखता यावी यासाठीच मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या महिला आता सक्षम आहेत त्यांनी भारत के वीर पत्नीसाठी साडेतीन कोटी रुपये जमा केले आहेत. त्यामुळे आताची महिलख ही सक्षम आहे. यापुढे ही ती अशीच काम करेल असा विश्वास मला वाटतो. – मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री
ही योजना ५ गावांमध्ये सुरू होणार
पालघर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, नागपूरसह ३४ जिल्ह्यांमध्येही योजना राबवली जाणार आहे.
देशात ३ कोटी महिला आहेत. त्यातील किमान २.५ कोटी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापर करणे गरजेचे आहे. पण, फक्त १७ टक्केच महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात. त्यामुळे मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन वापरणे किती गरजेचे आहे त्याबाबत जनजागृती झाली पाहिजे. ८० ते ९० टक्क्यापर्यंत हे प्रमाण घेऊन जायचे आहे. त्यामुळे, जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. – असिम गुप्ता , सचिव, एमएसआरएम
वाचा – अॅक्सेसरीजमुळे वाढली मोबाईलची किमंत, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण
वाचा – चिक्कीनंतर मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेवर आरोप