राज्यातील तमाम वारकऱ्यांना पुन्हा एकदा वारीसाठी निर्बंध घातल्यामुळे जाता आले नाही. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे यंदाही आषढी वारीवर कोरोनाचं सावट आहे. मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत तर आता कवी मनाचे नेते आणि मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पंढरीच्या वारीला निघाले आहेत. पंढरीच्या वारीला वारकऱ्यांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे अभिजीत बिचुकले यांनी इंग्रजांपेक्षा तुमचं राज्य वाईट वाटतं अशी टीका करत निशाणा साधला आहे.
आषाढी वारीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, तुम्हाला सांगितले होते की, आषाढी वारीला पंढरपुरला जाणार आहे. विठोबाच्या दर्शनासाठी मी निघालो आहे. पोलिसांनी संपुर्ण नाकेबंदी केली आहे. परंतु भगवंताच्या मनात असेल तर पोहचणार आहे. राज्य सरकारने एका बाजूला दारुची दुकाने सुरु ठेवली आहेत. नेते मंडळी राजकीय मेळावे घेत असून त्यासाठी तिथं हजारो लोकं येतात मात्र वारकऱ्यांना दर्शन घ्यायला रोखलं आहे. यामुळे इग्रजांपेक्षा तुमचं राज्य वाईट वाटतं असा खोचक टोला अभिजीत बिचुकले यांनी लगावला आहे.
माझ्याशिवाय पूजा यशस्वी नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मध्यरात्री २ वाजता महापूजा करण्यात येणार आहे. महत्त्वाची घोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पूजा करतील. मी त्यांना सांगू इच्छितो की, पहिली पायरी चोखाबाची असते आणि चोखोबा जर उद्या पूजेला नसतील तर अर्थात अभिजीत बिचूकले उपस्थित नसेल तर पूजा यशस्वी नाही असे मत स्वतः अभिजीत बिचूकले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा पंढरपूरात दाखल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री २ वाजता विठ्ठलाची महापूजा करतील. भरपावसात मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही आहेत.