घरमहाराष्ट्रशिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; भाजपची लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना

शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; भाजपची लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीतजास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार केलेल्या भाजपने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील पाच खासदारांच्या मतदारसंघांवर डोळा ठेवून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपने लक्ष्य केंद्रीत केलेल्या लोकसभा मतदारसंघात उत्तर पश्चिम मुंबई, नाशिक, मावळ, यवतमाळ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या या निवडणूक रणनीतीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत असल्याची माहिती दिली. भाजपचे केंद्रीय मंत्री या लोकसभा मतदारसंघात प्रवास करून लोकांशी संपर्क साधणार आहेत. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात चालू आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

- Advertisement -

मतदारसंघ प्रवास योजनेनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर आणि मावळ, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी आणि धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात इतर लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बळकटीचे काम होईल. केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील आणि त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम असतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्याच्या लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य संयोजक किशोर काळकर आहेत तर केंद्रीय लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे आहेत. राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे आणि त्याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र कोणकोणत्या विभागात मागे पडला यावर श्वेत पत्रिका काढावी, अशी आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे मागणी आहे. प्रत्येक विभागाचा अहवाल मांडला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल, अशी टीका बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली. दरम्यान,भाजपचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली.


गोवर नियंत्रणासाठी राज्यस्तरीय कृति गटाची स्थापना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -