मुंबई महापालिकेच्या इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ कोटी ७२ लाख रुपयांचे १९ हजार ९५९ टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकित मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबईत पुन्हा एकदा कोविड संसर्ग वाढत असल्याने मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अशा बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेने इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १९ हजार ९९५ किमतीचे १९ हजार ४०१ टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सदर प्रस्तावावर आक्षेप घेऊन पालिकेतील पहारेकरी भाजपकडून सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करीत घेरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबईतील कोविड संसर्गावर अलिकडेच नियंत्रण मिळविल्यानंतर पालिकेने इयत्ता ८ वी ते १० वीच्या शाळा उघडल्या. त्यानंतर इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळा सुद्धा नुकत्याच उघडण्यात आल्या.
मात्र काही मुंबईकरांच्या बेफिकिरीपणामुळे आता मुंबईत पुन्हा एकदा कोविड सोबत नवीन प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ चे रुग्ण पटापट आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईत कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर आता पुन्हा एकदा कोविडच्या ‘अमिबा’ सारखे हातपाय पसरण्याला वेळीच चाप लावला नाही, योग्य ती उपाययोजना केली नाही, तर समस्त मुंबईकरांचे जीव धोक्यात येणार आहेत.
दिल्लीमध्ये कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतही कोविडचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा शाळा बंद कराव्या लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल ३९ कोटी रुपयांचे टॅब वाटल्यास त्यांचा कसा व किती वापर होईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : मुंबईकरांची दिशाभूल करण्याची सुपारी शेलारांनी उचलली आहे – महापौर