मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा स्वतःच्या खुर्चीची जास्त चिंता आहे. तेव्हा मुख्यमंत्री आरक्षण देण्याबाबत काही करतील असे दिसत नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागत आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार हे खोटे बोलून सत्तेत आलेले सरकार आहे. या सरकारने आज महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद जाणीवपूर्वक निर्माण करू पहात आहेत, असा आरोप पटोले यावेळी केला.
नाना पटोले म्हणातात, “भाजपने 2014 मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले होते. आता केंद्रात भाजपची 10 वर्षपासून सत्तेत आहेत. पण आरक्षणाचे आश्वासन पाळू शकले नाहीत. यामुळेच राज्यातील आरक्षणाचा प्रश्न तीव्र गेला आहेत आणि समाज-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपकडून सुरू असून त्याचा परिणाम सर्वसामान्यावर होत आहे. यामुळे आज या सर्व समाजामध्ये भाजपविरोधात प्रचंड मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. पण सरकारला जनभावना समजत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, त्यामुळे ते काय आरक्षण देणार? असा सवाल करत नाना पटोले यांनी आज राज्य सरकारवर टीका केली. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला सत्तेतून हटवल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही नाना पटोले म्हटले.
मुख्यमंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले आहे. पण शिंदे यांच्या शब्दावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कारण शिंदे सरकारच्या शिष्टमंडळानेच मनोज जरांगे-पाटील यांना शब्द दिला होता. पण आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या शब्दाचे काय झाले ते आज दिसतच आहे. एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा स्वतःच्या खुर्चीची जास्त चिंता आहे. त्यामुळे ते आरक्षण देण्याबाबत काही करतील असे दिसत नाही, असा टोलाही नाना पटोलें लगावला.
हेही वाचा – Parbhani : मराठा आरक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर; काय आहे कारण?
देवेंद्र फडणवीसांना आश्वासनाचा विसर
राज्यात भाजपची सत्ता आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज 9 वर्ष झाली काय झाले त्या आश्वासनाचे? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले पुढे म्हणाले, “सत्ता द्या एका महिन्यात मराठा आरक्षण देतो आणि मराठा आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो” अशी गरजना देखील देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती. पुन्हा सत्तेत येऊन दीड वर्ष झाली असून देखील फडणवीसांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत या सरकारने फसवणूक केली आहे. यामुळेच गेल्या दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. आता लोकप्रतिनिधींविना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासक चालवत आहेत. त्यामुळे राज्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. आरक्षण मिळावे ही अनेक समाजाची मागणी आहे, या मागणीला न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.