घरमहाराष्ट्रभाजपकडून लोकशाहीची विटंबना - अशोक चव्हाण

भाजपकडून लोकशाहीची विटंबना – अशोक चव्हाण

Subscribe

कर्नाटकमधले १४ आमदार मुंबईतल्या सोफीटेल हॉटेलमध्ये थांबले असून भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचा निषेध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

‘कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार आणि इतर भाजपशासित राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरु असून भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे’, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, ‘हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरता साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा राजरोस गैरवापर सुरु आहे. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये देखील हीच नीती वापरून भाजपने सत्ता मिळवली. आता पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे’, असा आरोप चव्हाण यांनी केला.

‘मंत्री कर्नाटक सरकार पाडण्यात व्यस्त’

दरम्यान, मुंबईत कर्नाटकचे १४ आमदार सोफीटेल हॉटेलमध्ये येऊन थांबल्याच्या आणि भाजपकडून त्यांना चुचकारले जाण्याच्या प्रकाराचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ‘कर्नाटक सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रमुख मंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी कर्नाटक सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त आहेत. भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून आणि पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या पक्षाकडून पैशांची आमिषे दाखवून आणि सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला जात आहे. ही लोकशाहीची विटंबना असून अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे,’ असे अशोक चव्हाण म्हणाले.


हेही वाचा – ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था ही अफूची गोळी-सचिन सावंत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -