राज्यात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. शिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणाभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णही अजून आढळून येत आहेत. कोरोनाची तीव्रता व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाची आहे. अशात राज्याने कोरोनाविरोधी लसीचा बारा कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याने १० कोटींचा टप्पा ९ नोव्हेंबर तर ११ कोटींचा टप्पा २५ नोव्हेंबर रोजी पार केला होता. सध्या राज्यात १२ कोटी २ लाख ७० हजार ५८५ लस दिल्या आहेत. यात ४.३७ कोटी नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत. तर ७.६५ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत सांगितले की, “राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे बारा कोटी मात्रा देण्याचा टप्पा आज पार करण्यात यश आले. राज्याने १० कोटींचा टप्पा नऊ नोव्हेंबरला तर अकरा कोटींचा टप्पा २५ नोव्हेंबर रोजी पार केला होता,”
राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे बारा कोटी मात्रा देण्याचा टप्पा आज पार करण्यात यश आले.
राज्याने १० कोटींचा टप्पा नऊ नोव्हेंबरला तर अकरा कोटींचा टप्पा २५ नोव्हेंबर रोजी पार केला होता. सध्या राज्यात १२ कोटी २ लाख ७० हजार ५८५ लस दिल्या आहेत. ४.३७ कोटी नागरिकांना दोन्ही मात्रा pic.twitter.com/BSNVZPuYuu— Rajesh Tope (@rajeshtope11) December 7, 2021
राज्यातील कोरोनाची आकडेवारी
राज्यात ओमिक्रॉन विषाणूचे १० रुग्ण आढळले आहे. मात्र मंगळवारी एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. राज्यात मंगळवारी ६९९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १९ मृत्यू झाला आहे. उल्हासनगर, भिवंडी पालिका क्षेत्रात मंगळवारी एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात मंगळवारी १०८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,४४५ इतकी आहे.