कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाणे करण्यात येत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांना प्रीकॉशनरी तिसरा डोस देण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारीपासून तिसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा आकडा वाढला तर कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असा इशारासुद्धा राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच राज्यात तिसऱ्या डोसचे लसीकरण सुरु करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात यायला हवी. संसर्ग थांबायला हवा या दृष्टिकोनातून गर्दीवर नियंत्रण आणण्याचा शासनाचे मत आहे. निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठका होत असतात. आरोग्य विभाग, चीफ सेक्रेटरी, टास्क फोर्ससोबत चर्चा करत असतात. त्यामुळे जी काही मत आहेत ती जाणून घेऊन निर्बंधांबाबत निर्णय़ घेत असतात. त्यांच्या निर्णयानंतर आदेश जारी करण्यात येतात. मुख्यमंत्री लवकरच सगळा आढावा घेऊन निर्बंधाबाबत निर्णय घेतील. तसेच जर गरज पडली तर कठोर निर्बंधाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
जी लस घेतली तिचाच तिसरा डोस
आरोग्यमंत्री राजेश टोपे तिसऱ्या डोसच्या लसीकरणाबाबत म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगतो की, १० जानेवारी २०२२ या तारखेपासून आपण ६० वर्षांवरील लोकांना ज्यांनी २ डोस घेतलेत त्यांना आता तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर व्यवस्था केली आहे. यामध्ये ज्यांनी कोव्हिशील्ड घेतली आहे त्यांना कोव्हिशील्डच देण्यात येणार आहे. तसेच कोव्हॅक्सिचेही असणार आहे. यामध्ये कुठेही अडचण होणार नाही संपूर्ण तयारी केली असून राज्यात सूचना दिल्या आहेत. राज्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले आहे. तर प्रौढ व्यक्तींना तिसरा डोस देण्यात येणार आहे. १८ च्या पुढील व्यक्तींसाठी कोव्हिशील्डचे ६० लाख आणि कोव्हॅक्सीनचे ४० लाख डोस कमी पडत असल्यामुळे याची केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे मागणी केली आहे. डोसच्या संख्येत अडचण होणार नाही अधिक लस भारत सरकार देईल अशी आशा असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
हेही वाचा : मुंबईच्या महापौर PPE KIT सह उतरल्या BKC कोविड सेंटरमध्ये, म्हणाल्या बाळासाहेबांची धाडसाची शिकवण