राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज राज्यात कोरोनामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी मुंबईमधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात, वसई विरारमध्ये १ तर रत्नागिरीमध्ये १ झाला आहे. या मृतांमध्ये ३३ पुरुष आणि २१ महिला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ९७५वर पोहोचला आहे.
तसंच आज राज्यात १ हजार ४९५ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजार ९२२वर पोहोचला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ४२२ रुग्ण हे आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५ हजार ५४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २,३०,८५७ नमुन्यांपैकी २,०३,४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २५,९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड -१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९७५ झाली आहे.
हेही वाचा – करदात्यांना दिलासा; इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ