एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यांनी काम बंद केल्याने विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामीण भागातून येणार्यांची अडवणूक होत आहे, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर केली. न्यायालयाच्या कारवाईच्या भीतीनेच कामगारांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते संपाला संप म्हणण्याऐवजी दुखवटा म्हणत आहेत, असेही परब म्हणाले.
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, तुम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहात. असे असतानाही तुम्ही काम बंद करून जनतेला नाडले आहे. आज तुमच्यामुळे जनता अडकली आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शाळेत जायला बसेस नाहीत, रुग्णालयात जाणार्या रुग्णांना गावातून तालुक्याला आणि जिल्ह्याला येणे होत नाही. अशाप्रकारे अडवून ठेवले असेल तर याला संप म्हणायचा नाही? तर काय म्हणायचे असा सवालही त्यांनी केला. सदावर्ते वकील असून कोर्टात आम्ही कंटेम्प्ट पिटीशन दाखल केल्याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हा संप मान्य केला तर त्यांच्यावर कोर्टाची कारवाई होईल, अशी त्यांना भीती असल्यानेच ते संपात नसून दुखवट्यात आहे असे म्हणत असल्याचे परब यांनी सांगितले.
सध्या आम्ही अजून कुणाशी बोलायचे हाच प्रश्न आहे. आम्ही १ लाख कर्मचार्यांशी तर बोलू शकत नाही. मी या कर्मचार्यांच्या २९ संघटनांशी बोललो आहे. यानंतर संघटनांना बाजूला ठेवत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशीही बोललो. अजयकुमार गुजर ज्यांनी संपाची नोटीस दिली आणि त्या नोटीसवर हा संप सुरू होता. आम्ही त्यांच्याशी बोललो, अशी माहिती परब यांनी दिली. ज्या संघटनेने संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेनेच संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यात उद्या बुधवारी न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे आम्ही कर्मचार्यांना उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. उद्या कामगार कामावर येतील असे वाटते, असेही परब म्हणाले.