राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समोर आले होते. म्हणून महाराष्ट्र मास्कमुक्त होण्याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे धाधान्त खोट असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आज पुण्यातील कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, ‘मास्क लावायचा नाही अशा पद्धतीने काहीतरी बातमी सोडली गेली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मास्क लावायचा नाही अशी चर्चा झाली असल्याची बातमी सांगण्यात आली. हे धाधान्त खोटं आहे. मास्कमुक्त करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. नीटपणे माहिती घेऊन तशा प्रकारच्या बातम्या द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे सगळ्यांचे म्हणे मास्क वापरलाच पाहिजे असे आहे. इंग्लंड किंवा इतर देशांनी मास्कमुक्त करण्याचा निर्णय घेतला असेल त्यांना लखलाभ. मला त्याबाबत काही बोलायचे नाही. पण आपल्या राज्यांमध्ये तशा प्रकारची चर्चाही नाही. तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही. कृपा करून तशा प्रकारच्या बातम्या दाखवून लोकांच्या मनात गैरसमज पसरू नये, असे माझे स्पष्ट सांगणे आहे.’
यापूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्कमुक्त होणार असल्याचा हा गैरसमज असल्याचे सांगितले होते. आपाल्याला स्वतःला वाचवायचे असेल तर सर्वात चांगले शस्त्र मास्क आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा – School And College Reopen: पुण्यातील शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; अजित पवारांची घोषणा