घरमहाराष्ट्रबाबासाहेबांचे विचार आणि संविधानातच देश आणि देशवासियांची ताकद- अजित पवार

बाबासाहेबांचे विचार आणि संविधानातच देश आणि देशवासियांची ताकद- अजित पवार

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांचे संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी होते. समाजातून विषमता नष्ट व्हावी. समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी. प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. उपेक्षित बांधवांना ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था देशाला दिली. स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, लोकशाही दिवसेंदिवस मजबूत होत गेली, याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, दूरदृष्टीला आहे.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना त्यांनी आत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहूआयामी होते. ते कुशल राजकारणी होते. अभ्यासू समाजकारणी होते. महान अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कायदेतज्ज्ञ… साहित्यिक… ध्येयवादी पत्रकार होते.वंचितांच्या हक्कासाठी लढणारे महामानव होते. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, देशाची भौगोलिक, भाषावार प्रांतरचना, व्यापार, शेती, कामगारांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात रिकन्स्ट्रक्शन कौन्सिल सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात सिंचन व वीजप्रकल्पांसंदर्भातही मोठी जबाबदारी उचलली. दामोदर नदी खोरे, सोने नदी खोरे प्रकल्प, हिराकुड धरण प्रकल्पाचे काम त्यांच्या अखत्यारित झाले. रिझर्व्ह बँक, एलआयसीसारख्या संस्थांच्या स्थापनेतही त्यांचे मोलाचं योगदान आहे. डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन रचनात्मक कार्याने भरलेले आणि भारलेले आहे. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच सर्वांना पुढे नेतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती उद्या, आपापल्या घरीच साजरी करुया. डॉ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करुन डॉ. बाबासाहेबांच्या विचारांबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एकजूट दाखवून देऊया. असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -