भाजपच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कार्याकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी सत्ताधारी माहाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. भाजपच्या नेत्यांना दोन-दोन वर्ष तुरुंगात टाकण्यात आले होते. भाजप संघर्षातून मोठा झालेला पक्ष आहे. भाजपला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे परंतु भाजप खंबीर आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि कारभार काढून घेण्यासाठी मोठा संघर्ष सुरु करावा लागणार आहे. या संघर्षादरम्यान त्रास होईल, दाबण्याचा प्रयत्न होईल परंतु घाबरु नका असे आवाहन भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात लोकशाही तुडवण्याचे काम रोज होत आहे. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा राहिली नाही. सरकारच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला जेलमध्ये घालू, सरकारच्या नितीचा विरोध कराल तर घरं तोडण्यासाठी माणंस पाठवू हे जे काही लोकशाहीविरोधी काम सुरु आहे. याचा मुकाबला करावा लागणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती तुडवण्याचे काम महाराष्ट्रातील सरकार करत आहे. हे करत असताना ज्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलिन होत आहे. या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि कारभार काढून घेण्यासाठी मोठा संघर्ष सुरु आहे.
सत्ताधारी भ्रष्टाचारावर उत्तर देऊ शकले नाही
अधिवेशनात मुंबई महानगरपालिकेतील करोडो रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली. हजारो कोटी रुपये जे गरिबांच्या कामी आले असते. तो पैसा कसा खाल्ला, कशी दरोडेखोरी केली याची माहिती भाजपच्या आमदारांनी मांडली पण त्याला एकही उत्तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दिले, याचे कारण ते उत्तर देऊ शकले नाही.
त्रास देण्याचे काम होईल परंतु घाबरणार नाही
कोविडच्या काळात मरणाऱ्या माणसांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. कुठल्या पक्षाशी आमची लढाई नाही तर कुठल्या पक्षापासून मुक्त करायचे नाही तर मुंबईला भ्रष्टाचाऱ्यांपासून मुक्त करायचे आहे. आपण संघर्ष करणारे लोकं आहोत येत्या काळात आपल्याला मोठा संघर्ष करायचा आहे. आपल्याला त्रास देण्यात येईल परंतु आपण घाबरणार नाही. आपण कधीही दबलो नाही कारण भाजपने प्रत्येक परिस्थितीचा मुकाबला केला आहे. म्हणून आपण मोठे झालो आहोत. एकिकडे मोदींजींचा गरीब कल्याणाचा अजेंडा पुढे नेऊ आणि दुसरीकडे यांचा स्वकल्याणाचा अजेंडा उघडा पाडू आणि शेवटच्या माणसापर्यंत जनजागृती करून यांना सिंहासनावरुन खाली खेचल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावे. जनतेचे सरकार जनतेच्या हिताचे सरकार आपण निश्चित तयार करु यासाठी सगळा संघर्ष आपण करु असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
देशात लोकशाहीत खऱ्या अर्थाने घराणेशाहीचा आघात
या देशात लोकशाहीत खऱ्या अर्थाने आघात असेल तर तो घराणेशाहीचा आघात असेल, या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड पक्ष पाहायला मिळत आहेत. यांचा एवढचा उद्देश आहे की, मी माझा परिवार आणि माझी संपत्ती याच्या पलिकडे देशाचा विचार कोणामध्येही नाही. अशा प्रकारचे केवळ स्वकेंद्रित आणि आपले बस्तान बसवायचे आणि आपलं राज्य चालवायचे अशा विचाराच्या पक्षाने लोकशाहीवर आघात केला आहे. किंवा लोकशाहीवर ज्या प्रकारे खतरा निर्माण केला आहे. त्याच्याविरोधात भाजपसारखा पक्ष जो आजच्या भाषेत पब्लिक लिमिटेड आहे. या पक्षाचा मालक जनता आणि कार्यकर्ते आहेत. या पक्षातील कार्यकर्ता कोणत्याही पदावर जाऊ शकतो कारण हा जनतेचा पक्ष आहे. खरी लोकशाही ज्या पक्षाने जिवंत ठेवली आहे अशा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
हेही वाचा : त्यांचा मुंबई महापालिकेतील पराभव ही काळ्या पाटीवरची सफेद रेष, आशिष शेलारांचा घणाघात