गोपीनाथ मुंडे स्मारकावरुन विधानसभेत खडाजंगी; धनंजय मुंडे, अतुल भातखळकर आमने सामने

गेली अनेक वर्षे मी देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो. अर्थसंकल्प कसा मांडावा यावर फडणवीस यांनी पुस्तक लिहिले आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना अर्थसंकल्प मांडता आला नाही. मात्र आता त्यांना उपमुख्यमंत्री असताना अर्थसंकल्प मांडता आला. पण ते त्या अर्थसंकल्पाला न्याय देऊ शकले नाहीत, असा टोला धनंजय मुंडे यांनी हाणला.

 

मुंबईः भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे व भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यामध्ये सोमवारी विधानसभेत शाब्दिक चकमक झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरकावरुन आमदार धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तर आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर सोमवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपली मते मांडली. अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना आमदार धनंंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची आठवण करुन दिली. या अर्थसंकल्पात सरकारला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विसर पडला, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

गेली अनेक वर्षे मी देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो. अर्थसंकल्प कसा मांडावा यावर फडणवीस यांनी पुस्तक लिहिले आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना अर्थसंकल्प मांडता आला नाही. मात्र आता त्यांना उपमुख्यमंत्री असताना अर्थसंकल्प मांडता आला. पण ते त्या अर्थसंकल्पाला न्याय देऊ शकले नाहीत, असा टोला धनंजय मुंडे यांनी हाणला.

धनंजय मुंडे यांच्या नंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अर्थसंकल्पावर आपले मत मांडले. आमदार भातखळकर यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्या टीकेली उत्तर दिले. गोपीनाथ मुंडे हे आमचे नेते आहेत आणि कायम राहतील. पण ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना आता प्रमाचे उमाळे येत आहेत, असे प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिले.

मात्र कोणीही व्यक्तित आरोप करु नयेत. भातखळकर यांच्या विधानावर माझा आक्षेप आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे आमदार भातखळकर यांनी स्पष्ट केले. तुम्ही मलाच बोलत आहात, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. भातखळकर यांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे. मी मुंडे साहेबांचा पुतळ्या आहे. पंडित आण्णांचा चिरंजीव आहे. मी पाठीत खंजीर खुपसला नाही. ११ जानेवरी २०१२ रोजी मला आणि माझ्या वडिलांना पक्षातून बाहेर काढत, रक्ताचे नाते तोडण्याची घोषणा झाली याची आठवण धनंजय मुंडे यांनी करुन दिली.

त्यावर आमदार भातखळकर म्हणाले, धनंजय मुंडे यांना आता गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली आहे. ते आता आम्हाला सांगत आहे की गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडला. मात्र ज्यांनी जिंवतपणी गोपीनाथ मुंडे यांना मानसिक त्रास दिला. आमदारकी मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना आता प्रेमाचे उमाळे येत आहेत. याला पुतळ्या- मावशीचे प्रेम म्हणतात.

यावर धनंजय मुंडे म्हणाले, मुंडे साहेबांच्या पाठीत कोणी-कोणी खंजीर खुपसला याचे सर्वजण साक्षीदार आहेत. अमित साटम, भातखळकर यांना सर्व माहिती आहे. दहा वर्षे संघर्ष करुन मी येथे आलो आहे. त्यामुळे व्यक्तित आरोप करु नयेत.

मात्र कितीही नाटकी पणाने बोललात तरी याला महाराष्ट्र फसणार नाही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारुन तुम्हाला आमदार केले. तरी गोपीनाथ मुंडेंना त्रास देण्याचे काम तुम्ही केले ही वस्तुस्थिती आहे, असा दावा भातखळकर यांनी केला.