घरमहाराष्ट्रईडी वाचवतेय भाजपच्या माजी मंत्र्यांना - मलिक

ईडी वाचवतेय भाजपच्या माजी मंत्र्यांना – मलिक

Subscribe

वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यात हात मारलेल्या भाजपच्या दोन नेत्यांना लवकरच अटक होईल, असा गर्भीत इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. ज्यांनी जमिनी लाटल्या त्यांची सारी माहिती मंत्रालयाला प्राप्त झाल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मागणीचाच आम्ही पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले. वक्फ बोर्डाच्या छापेमारीत ईडीच्या अधिकार्‍यांनी वक्फच्या जमीन घोटाळ्यातील माजी मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावर वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचा आरोप केला होता. याच कारणास्तव लवकरच मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आम्हीही किरीट यांच्या मागणीचा पाठपुरावा करत होतो, असे नवाब यांनी सांगितले. आमच्याकडे येणार असतील तर आम्ही ईडीच्या अधिकार्‍यांची पुष्पगुच्छ घेऊन वाट पाहत आहोत. आमच्याकडे तयार असलेल्या फाईल त्यांच्या ताब्यात देऊन सरकार म्हणून संबंधितांना अटक व्हावी यासाठी पाठपुरावा करू, असा उलटवार नवाब यांनी किरीट यांच्यावर केला. आजपर्यंत ते आले नाहीत, आले तर त्यांचे स्वागतच करू, असे मलिक म्हणाले. वक्फ बोर्डाची जागा आम्ही हडपली की कोणी हे ईडीच्या माध्यमातून किरीट यांना कळूदे, असे नवाब यांनी बजावले.

- Advertisement -

ज्यांनी जमिनी हडपल्या त्यातल्या दोन तर पुण्यातील आहेत. तिथल्या एफआयआरमध्ये त्या माजी मंत्र्यांची नावे आहेत, त्यांचीच आरती ईडीला ओवाळावी लागेल, असे नवाब यांनी म्हटले. फार दूर नको, पुढच्याच आठवड्यात ही कारवाई होईल, हे किरीट सोमय्या यांनी ध्यानात घ्यावे, असे मलिक उत्तरले. राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटलेल्या एकालाही आम्ही सोडणार नाही. बघू ईडीचे अधिकारी भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना कधी बोलावतात. आमच्या माहितीच्या आधारे वक्फ बोर्डामध्ये कुठल्या केस रजिस्टर केल्या, त्याची काय प्रगती आहे, त्यात आणखी कोण आरोपी होऊ शकतो, याची रितसर माहिती आम्ही मागणार आहोत, असेही नवाब यांनी सांगितले. आवश्यकता पडल्यास किरीट सोमय्या यांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मलिक यांनी सुचवले.

भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून पुण्यात एंडोमन ताबूत प्रकरण चौकशीत आहे. यात आम्ही एफआयआर दाखल केला होता. त्या प्रकरणी ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. तपास सुरू केला. माध्यमांमध्ये बातम्या पसरवण्यात आल्या की वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्याच दिवशी आम्ही स्पष्ट केले की वक्फ बोर्डावर छापेमारी झाली नाही. त्यांना काही तपास करायचा असेल तर ३० हजार रजिस्टर आहेत. आम्ही सर्व कागद द्यायला तयार आहोत. माझ्याकडे माहिती आली आहे. काल वक्फ बोर्डाच्या एका अधिकार्‍याला दोन दिवसांसाठी बोलावण्यात आले. ईडीचे अधिकारी वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍याला सांगत आहेत की तुम्ही एफआयआरच चुकीचा दाखल केला आहे. ज्या लोकांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करण्याचे काम ईडीचे अधिकारी करत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

किरीट सोमय्यांना प्रवक्ता बनवा!
ईडीच्या अधिकार्‍यांना सांगू इच्छितो, किरीट सोमय्या यांना प्रवक्ता बनवला असाल तर ईडीने अधिकृतरित्या जाहीर करावे. जो काही खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. जर कोणती कारवाई होणार आहे, तर अधिकृतरित्या प्रेस नोट जाहीर करा. माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील नेत्यांना, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे काम बंद करा, असे मलिक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -