गेल्या ३ ते साडेतीन दशकं भाजपचं नेतृत्व करणारे आणि भाजपची वाढ करण्यासाठी मुंडेंसोबत अनेक वर्ष काम करणारे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्याचं आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं मला सांगितलं आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढणार आहे. अनेक वर्षांचा अनुभव असलेला नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे. आज एकनाथ खडसेंचा प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून जो अन्याय होत आहे, तो महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्यांनी मला भाजपचा त्याग करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली आहे. येणाऱ्या व्यक्तीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आणि राज्यातल्या जनतेशी किती बांधिलकी आहे, ते पाहून आम्ही पुढच्या जबाबदारीविषयी निर्णय घेत आहोत, असं देखील जयंत पाटील म्हणाले.
एकनाथ खडसेंसोबत बऱ्याच भाजप आमदारांना राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. मात्र कोरोनाच्या काळात राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे इतर आमदारांबाबत त्या त्या वेळी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत त्यांच्या विचारांना मानणारे, ज्यांच्यावर खडसेंप्रमाणेच भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यांच्या प्रगतीमध्ये अडसर आणला गेला, असे लोकं देखील राष्ट्रवादीत येतील. मात्र, इतर आमदारांबद्दल त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल. त्यांच्यावर दिल्या जाणाऱ्या जबाबदारीविषयी पक्षप्रमुख शरद पवार आणि इतर नेते योग्य वेळी निर्णय घेतीलच, असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.
ही धक्कादायक बातमी आहे. पक्षासाठी ही चिंतनाची बाब नक्कीच आहे. ४० वर्ष पक्षाची मनापासून सेवा करणारा खडसेंसारखा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातो त्यावर मी नि:शब्द आहे. त्यांनी जाऊ नये असं मला नेहमी वाटायचं. त्यांना मी इतकंच सांगेन ‘ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना’. हा त्यांचा निर्णय आहे. संघटनेवर प्रेम करणारा नेता जातोय हे धक्कादायक आहे.
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
खडसेंनी घेतलेला निर्णय भाजपपेक्षाही त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. भाजपमध्येच त्यांचं राजकीय करिअर घडलं. पण काही कारणांमुळे राजकीय मुख्य प्रवाहातून ते बाजूला गेले होते. पण यासाठी त्यांनी पक्ष सोडायला हवा असा त्याचा अर्थ नव्हता. वाद नक्कीच निस्तरता आले असते. पण त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागत असतो. त्यांना पक्षानं नक्कीच न्याय दिला असता.
रावसाहेब दानवे, भाजप नेते
भाजपमध्ये जी त्यांची किंमत होती, ती कधीही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळणार नाही. त्यांच्यासोबत प्रचलित नेता कुणीही जाणार नाही. कुणीही इतकं धैर्य दाखवणार नाही. येणाऱ्या काळात त्यांना याचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
राम शिंदे, नेते, भाजप