घरमहाराष्ट्र...माणसांचा मेंदू काम करेनासा होतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

…माणसांचा मेंदू काम करेनासा होतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

Subscribe

 

मुंबईः  काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला ट्वीट करुन दिले आहे.

- Advertisement -

जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं पुढे काय होणार?, मी मुख्यमंत्री असताना जे मला करता आलं ते मी केलं. परंतु ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला मी घेणारच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करुन उत्तर दिले.

- Advertisement -

दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटमधून उद्धव ठाकरे यांना लगावला.

चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटमधून उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -