एल्गार परिषद प्रकरणी कबीर कला मंचच्या दोघांना NIA कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांवर माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय, एल्गार परिषदेचे आयोजन आणि जमावाला भडकवल्याचा आरोप देखील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सागर गोरखे आणि रमेश गायचोर अशी त्यांची नावं आहेत. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.
पुण्यातील शनिवार वाड्यावर २०१७ मध्ये शनिवार एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घडला. केंद्राने एल्गार परिषदेचा तपास जानेवारीमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे सोपविण्यात आला. त्यानंतर एनआयएने काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज एनआयएनं आणखी दोघांना पुण्यात अटक केली आहे. ज्या समितीने एल्गार परिषदेचं आयोजन केलं होतं, त्या भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान समितीचे हे दोघे त्यावेळी सक्रिय सदस्य होते. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
याआधी जुलैमध्ये NIA ने दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू एम. टी यांना अटक केली होती. त्यानंतर NIA ने गोरखे आणि गायचोर यांच्यासह अनेकांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मागील काही दिवसांपासून गोरखे आणि गायचोर यांना NIA कडून मुंबईला चौकशीसाठी बोलवलं जात होतं. त्यानंतर सोमवारी ८ सप्टेंबरला त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितलं. एल्गार परिषद प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी देशभरातून नऊ लोकांना अटक केली व एकूण २३ जणांना आरोपी केलं होतं. हे सर्व आरोपी प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय, प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार माओवाद्यांकडून पैसे घेऊन एल्गार परिषद आयोजित केल्याचाही आरोपही पोलिसांनी केला होता.