घरमहाराष्ट्रनागपूरकाँग्रेसमधून हकालपट्टी, पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत? आशिष देशमुख-फडणवीसांच्या भेटीचे कारण काय?

काँग्रेसमधून हकालपट्टी, पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत? आशिष देशमुख-फडणवीसांच्या भेटीचे कारण काय?

Subscribe

काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्याने आशिष देशमुख हे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. पण आज (ता. 20 मे) अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

वारंवार पक्ष नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य केल्याने महिन्याभरापूर्वी आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. आशिष देशमुख हे काँग्रेसचे नागपुरमधील मोठे नेते मानले जायचे. पण पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात बोलल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्याने आशिष देशमुख हे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. पण आज (ता. 20 मे) अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra fadnavis) हे आशिष देशमुख (Aashish deshmukh) यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – ‘असे निर्णय देशाला परवडणारे नसतात’; 2000 रुपयांच्या नोटबंदीवर राज ठाकरे कडाडले

- Advertisement -

आज सकाळीच देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघातून प्रभावी उमेदवार हवा असल्याने फडणवीस आणि बावनकुळे याबाबतची चर्चा करण्यासाठी देशमुखांच्या घरी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशिष देशमुख यांच्या घरी जाण्याने देशमुख हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर नागपुरातून अनिल देशमुख किंवा सुनील केदार यांच्याविरोधात भाजप आशिष देशमुखांना उमेदवारी देऊ शकते, अशी देखील चर्चा आता करण्यात येत आहे. त्यामुळे या तिघांच्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून या भेटीचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

आशिष देशमुखांची होऊ शकते घरवापसी?
आशिष देशमुख यांना फार मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र आहेत. पण जिल्ह्यातील राजकारणात सुनील केदार गटाशी न पटल्याने आशिष देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश करत खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर ते सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढले. परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेरऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत आशीष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करत विजय मिळविला. मात्र काही वर्षांमध्येच त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भ विकासाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. ज्यानंतर त्यांनी त्यावेळी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारवर टीका केल्याने ते भाजपामध्ये एकाकी पडले. पण नंतर देशमुखांनी ऑक्टोबर 2018 मध्ये काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पश्चिम नागपूर विधानसभेतून निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत फडणवीस हे 48 हजार मतांनी विजयी झाल्याने देशमुखांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आशिष देशमुखांनी दिले स्पष्टीकरण..
देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी आजही काँग्रेसमध्ये आहे. मला दिलेल्या नोटीसचे सविस्तर उत्तर दिले आहे. मला खात्री आहे की मला काँग्रेस पक्ष काढणार नाही. त्यामुळे आशिष देशमुख यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांवर पूर्णविराम लावला असला तरी याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -