घरमहाराष्ट्रअवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीचा तगादा नको, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीचा तगादा नको, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध शिष्टमंडळांनी आज, गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्पकर्जदार शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने बेकायदेशीरपणे कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या जप्ती आणि लिलाव सुरू केले आहेत. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालायचे काम सरकारने करायला हवे आणि त्यासाठी फक्त नाशिकमध्येच नाही तर सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना व्याजात सूट द्यायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

त्यावर, सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्पकर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीत काजू बीसाठी हमी भाव जाहीर करणे, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास, सिडको गृहनिर्माण लॉटरी सोडतधारकांच्या विविध समस्या, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा – मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना वाढला, राज्यात २५ कोविड रुग्णालये पुन्हा होणार सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -