मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. उद्या सकाळी ११ पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. यामुळे ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवता येणार आहे. अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी ते अर्ज दाखल करू शकणार आहेत. त्यामुळे आता ही लढाई चांगलीच अटीतटीची होणार आहे.
आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिंदे गटाने केलेल्या खेळीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्या मुंबई पालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांना महिनाभर आधी राजीनामा देणे बंधनकारक आहे. आता यावरूनच कलगीतुरा रंगलेला आहे. ऋतुजा यांनी २ सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा पत्रात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. लटके यांनी पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी नव्यानं राजीनामा दिला. पण त्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय पालिका अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. राजीनामा स्विकारण्यासाठी ऋतुजा लटके यांनी काल स्वतःहून महापालिका आय़ुक्तांचीही भेट घेतली. आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज या याचिकेवर सुनावणी झाली.
मुंबई उच्चन न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत ऋतुजा लटके यांच्या बाजूने कौल दिला. ऋतुजा लटके यांना दिलासा दिला असून उद्या ११ पर्यंत पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पालिकेने राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला फटकारले आहे. पालिकेचा क वर्गातील कर्मचाऱ्याला जर निवडणूक लढवायची असेल तर नियमाप्रमाणे तुम्ही याआधीही राजीनामा स्विकारला आहे. पण याच प्रकरणात भेदभाव का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. तसंच, दुपारी अडीच वाजेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दुपारी अडीचनंतर पुन्हा दुसऱ्या सत्रांत सुनावणी सुरू झाली. दुसऱ्या सत्रात पालिकेच्या वकिलांनी युक्तीवाद करत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारणं बेकायदा असल्याचा युक्तीवाद केला. तसंच, लटकेंच्या याचिकेत तथ्य नसल्याचंही ते म्हणाले.