नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या शेतकर्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे. शेतकर्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळी आपण 1 लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी 10 रुपये जास्त देऊन 20 रुपये देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही असा अजब सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला.
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत आंदोलने करण्यात आली. तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेत असताना केंद्राच्या या निर्णयाबाबत असमन्वय दिसून येत आहे. अशातच पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील प्रतिक्रिया देत ’कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी दादा भुसे म्हणाले की, कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकर्यांना आहे.
ज्यांनी कांदा खरेदी केला व निर्यात करणार, यावरदेखील व्यापार्यांमध्येही थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल, त्यामुळे हा सत्ताधारी, विरोधक असा विषय नाही. काही वेळा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतात, तर काही वेळा 2 हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावे लागते. तसेच नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
- कांदा पेटला, सरकार हादरले ?
- कांदा निर्यात शुल्क वाढीचा तुघलकी निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी