राज्यात भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम मेला पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले पाठीत खंजीर खुपसला अशी टीका करत आहेत. मात्र, राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते, पण लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”, असे जयंत पाटील म्हंटले आहे.
राज्यात भाजप विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. मात्र, गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्र जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची सध्या आम्ही माहिती घेत आहे. सध्या प्रफुल्ल पटेल परदेशी गेलेले आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले.