गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडीडी चाळींच्या नामकरणाची घोषणा केली होती. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वरळीतील बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ ही शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील 100 वर्षांपेक्षा जुन्या इमारती आहेत. बीडीडी चाळीची पुर्नविकास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे म्हाडाच्या जागांवरील अतिक्रमण हटवणे, धारावी आणि बीडीडी चाळीचा पुर्नविकास करणे या गोष्टी सरकारच्या अजेंड्यावर आहेत.
बीडीडी चाळीतल्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना हक्काच्या घरांसाठी 50 लाखांची किंमत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही किंमत कमी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशांने शिवसेना नेते वरळी, नायगाव येथील पोलीस वसाहतीत जाऊन पोलीसांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार असून 50 रुपयांच्या किमती विषयी कुटुंबियांचे मत जाणून घेणार आहेत.
मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने त्यावर निर्णय घेत पोलिसांना घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, यावरुन राजकारण सुरु झाले आहे. मागील आठड्यात एका वृत्तवाहिनीच्या खासगी कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांना फुकटात घर देणे अव्यवहारिक ठरेल, असे म्हटले होते.