मुंबई – यंदा राज्यात लवकर पाऊस परतण्याची शक्यता होती. मात्र, अद्यापही परतीचा पाऊस सुरू झाला नसल्याने पावसामुळे वैतागलेल्या मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्र पाऊस परतण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत उत्तर भारत, कच्छच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली असून पावसासाठी एक कविताही लिहिली आहे. यावरून लवकरच पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सनने उशिराने एन्ट्री घेतली. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुफान पाऊस झाला. नदी नाले तुंबले. गावागावात पाणी शिरलं. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊसच झाला नाही. मात्र, ऑगस्टच्या अखेरच्या पंधरवड्यात विदर्भासह अनेक ठिकाणी तुफान पाऊस बरसला. त्यामुळे शेततळी पाण्याखाली आली. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पावसाच्या परतीचे वेध लागले आहेत.
राज्यात यंदा पावसाळी हंगामात (१६ सप्टेंबरपर्यंत)१,१४९ मिमी पावसाची नोंद झाली. राज्याची पावसाची सरासरी ९१६.६ असल्याने राज्यात २५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात ११९४.३ मिमी पाऊस पडला होता.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्वांना आता मान्सूनच्या परतण्याची प्रतीक्षा आहे. पाऊस आता लवकरच राज्यातून जाणार असल्याने हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर भावूक झाले आहेत. त्यांनी एक कविता पोस्ट केली आहे.
पुढील २ दिवसांत उत्तर भारत, कच्छच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून 🌧 परतीसाठी अनुकूल परिस्थिती.
– IMD
परत कधी येशील तु दारी …😔 pic.twitter.com/2yufY5ezUK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 19, 2022