कोल्हापूरः शरद पवार यांनी सांगावे की हसन मुश्रीफ यांनी घोटाळा केलेला नाही. मुश्रीफ सांगत आहेत ते सर्व सत्य आहे, असे आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिले.
सोम्मया म्हणाले, मी सर्व पुरावे दिले आहेत. त्यामुळेच ईडीने कारवाई केली. कोलकाता येथील बोगस कंपनीतून मुश्रीफ यांना दिडशे कोटी मिळाले. रजत कंपनी व माऊंट कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही अशी काय किमया झाली की या वित्त कंपन्यातून मुश्रीफ यांना ४९ कोटी ८५ लाख रुपये मिळाले. त्यांच्या जावयाच्या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून मुश्रीफ यांनी राज्यभरातील ग्रामपंचायतींना फर्मान जारी केले. त्यानुसार ग्रामपंचायती मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीला वर्षाला ५० हजार रुपये देणार होती. मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीला वर्षाला १५० कोटी मिळणार होते. त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला. नंतर तो रद्द करण्यात आला. हा अध्यादेश का काढण्यात आला. कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आला याची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे, अशी माहिती सोम्मया यांनी दिली.
मी पुरावे दिले आहेत. त्यामुळे आता मुश्रीफ यांनी त्याला उत्तर द्यायला हवे. मुश्रीफ यांना उत्तर देता येत नाहीत. ते दिशाभूल करतात. मी मुस्लिम आहे, म्हणून लक्ष्य केले जात आहे. मला स्वप्नात ईडी चौकशीचे निमंत्रण दिसते, अशी वल्गना मुश्रीफ करत आहेत. घोटाळे केले तेव्हा धर्म आठवला नाही का, असा सवालही सोम्मया यांनी केला. मुश्रीफ, नवाब मलिक किंवा अस्लम शेख, कोणीही घोटाळा केला तरी त्याचा हिशेब त्यांना द्यावा लागणार आहे, असेही सोम्मया यांनी सांगितले.
मी मुंबईकर आहे. मला उत्तर नाही दिले तरी चालेल. पण मुश्रीफ यांनी किमान कोल्हापूरकरांना मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. शरद पवार हे मुश्रीफ यांची पाठराखण करत असतील तर त्यांनी पुढे येऊन सांगावे की मुश्रीफ यांनी घोटाळा केलेला नाही. मुश्रीफ सत्य बोलत आहेत, असे आवाहनही सोम्मया यांनी केले.
चौकशी चहल यांची नाही तर घोटाळ्यांची
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीने (सक्तवसुली संचलनालय) चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांची चौकशी होणार नसून लाईफलाईन हॉस्पिटलला अनुभव नसताना कोविड रुग्णालय सुरु करण्याचे शंभर कोटी रुपयांचे कंत्राट कसे देण्यात आले याची चौकशी ईडी करणार आहे. हे कंत्राट देण्यासाठी मातोश्रीवरून फोन आला की भांडूपवरून हे आता स्पष्ट होईल, असे सोम्मया यांनी सांगितले.
भावना गवळी, प्रताप सरनाईक यांचे घोटाळे त्यांच्याच काळातील
भावना गवळी व प्रताप सरनाईक यांचे घोटाळे ठाकरे सरकार असताना झाले आहेत. त्याची तक्रार केली आहे. ही तक्रार मी मागे घेतलेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याचा पाठपुरावा उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी करावा. मी माझे काम करतो आहे. संजय राऊत यांच्यासाठी वाईन कायद्यात बदल करण्यात आला. नंतर तो बदल मागे घेण्यात आला. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी मिळालेल्या पैशांनी संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केली. त्याचा हिशेब प्रत्येकाला द्यावा लागेल, असेही सोम्मया यांनी सांगितले.