उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तीही मार्च पासून होणार आहे. केवळ २ लाखांचे कर्जमाफ करुन शेतकरी चिंतामुक्त होणार आहे का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला असून महा विकास आघाडीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
तसेच ही कर्जमाफी पिक कर्जाची माफी आहे की, ट्रक्टर आणि इतर कृषी बाबींची ? याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. या घोषणेचा फायदा नेमका किती शेतकऱ्यांना होणार? याबाबत संभ्रम आहे. ३० सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे संपुर्ण महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली आलेला आहे. मात्र त्यांची कर्जमाफी होणार नाही. आता या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळू शकणार नाही. आम्ही सभागृहात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना पुन्हा कर्ज मिळावे, यासाठी त्यांच्या कर्जाचे पुर्नगठन केले जाईल.
अंतिम आठवडा प्रस्ताव आणि विदर्भाच्या विकासाच्या चर्चेला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी कुठलीही नवी घोषणा केलेली नाही. आम्ही सुरु केलेल्या योजनाच त्यांनी पुन्हा सांगितल्या असल्याचेही फडणवीस म्हणाले.