अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर सरकारने मदत जाहीर केली नाही तर अनेक शेतकरी आत्महत्येचे मार्ग स्वीकारतील अशी भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप हे सरकार आपल्या डोक्यावर घेणार का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी नागपूरात उपस्थित केला. तर येत्या काळात आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा करताना त्याची सुरुवात कोकणापासून करणार असल्याचे दरेकर यांनी यावेळी जाहीर केले आहे.
नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनच्या पाश्वभूमीवर सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना दरेकर यांनी हा सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे. २५ हजार हेक्टरी मदत करावी हे त्यांचीच मागणी होती. तीच आम्ही करत आहोत. मला विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाने संधी दिली आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
तर आपण अगोदर शिवसेनेत होता, आता तुमच्यासमोर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्टकॉर्नर असेल का ? याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली तर ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तेवढे काम केले नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जास्त काम केले. त्यामुळे सॉफ्टकॉर्नर द्याचाचे झाले तर तो फक्त उद्धव ठाकरे म्हणून असेल. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणताही सॉफ्टकॉर्नर मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तर हे सरकार नवीन आहेत त्यामुळे त्याला वेळ देणार का याबद्दल बोलताना दरेकर म्हणाले की, जे प्रश्न तातडीने सोडवायचे आहेत त्याला संधी दिली जाणार नाही, परंतु जे प्रश्न सवडीने सोडवायचे असतील त्यासाठी नक्कीच त्यांना वेळ दिला जाईल असे जाहीर केले.
तर सध्या मासेमारीवर देखील दुष्काळ ओढवला आहे यासाठी केंद्राची मदत लागणार असून यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून गरज पडल्यास त्यासाठी केंद्राशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी जाहीर करताना लवकरच कोकणात साखर कारखाना सुरू करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर येत्या काळात कोकणचा महामार्गाचा प्रश्न ही लवकरच सोडवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेच्या नेत्यांनी अभिनंदन केले
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर मनसेचे राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या का, याबद्दल बोलताना ते म्हणाले मनसेचे बाळा नांदगावकर असो किंवा नितीन सरदेसाई सारख्या अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.