घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बिनविरोध निवडीत अडथळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बिनविरोध निवडीत अडथळे

Subscribe

विधान परिषद निवडणूक, काँग्रेसकडून दोन उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चढाओढ

विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी काँग्रेस राष्ट्रवादीतील चढाओढ सुरू असल्याने व त्यातच काँग्रेसने शनिवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांची घोषणा केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात यावर अवलंबून राहणार आहे.

काँग्रेसने सायंकाळी प्रदेश सचिव व युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांची एकाच उमेदवारांची प्रारंभी घोषणा केली होती. त्यामुळे काही काळ काँग्रेस विधान परिषदेची एकच जागा लढवेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, रात्री काँग्रेसने दुसराही उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही धक्का दिला आहे. दुसर्‍या जागेसाठी काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीने देखील दोन उमेदवार देण्याचे अंतिम केले असले तरी अद्याप पर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत यापूर्वी झालेल्या समझोत्यानुसार राष्ट्रवादी एका जागी उमेदवार उभा करते की काँग्रेसच्या दबावाला न जुमानता दोन उमेदवार अर्ज भरतात का यावर विधान परिषदेची निवडणूक होते की चुरशीची अटीतटीची होते हे अवलंबून आहे. राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी व शशिकांत शिंदे अशा दोघांची परिषद निवडणुकी करता सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांच्या उमेदवारीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अंतिम मोहोर उमटलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी एका उमेदवाराचा अर्ज दाखल करते की दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करते यावर विधान परिषद निवडणुकीचे राजकीय गणित अवलंबून आहे.

- Advertisement -

अर्ज दाखल केल्यानंतर 14 मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्या जरी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दोघा उमेदवारांनी अर्ज दाखल केले तरी 14 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास बिनविरोध निवड होणे शक्य होणार आहे.त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतील चढाओढ व दबावाचे राजकारण 14 मे पर्यंत सुरू राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.भाजपने या निवडणुकीत चार उमेदवार उभे केले आहेत. नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजीत सिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे असे भाजपचे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना उपनेते या नीलम गोर्‍हे हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. एका उमेदवाराच्या विजयासाठी 29 मतांची आवश्यकता आहे त्यानुसार शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. मात्र त्याची तजवीज शिवसेनेने आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत. तर त्यांना ७ आमदारांचा पाठिंबा आहे.संख्याबळापेक्षा १० अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने करून भाजपचा चौथा उमेदवार सहज विजयी होईल असेही त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीचे असणारे संख्याबळ, घटक पक्षांचे आणि अपक्ष आमदारांच्या जोरावर महाराष्ट्र विकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी होतील असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे. राजेश राठोड आणि बीड जिल्ह्याचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -