राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. महागाई, पुरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आंदोलनास केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी ईडी सरकार हाय हाय…, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच काँग्रसेचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, अंबादास दानवे सहभागी झाले आहेत.
यावेळी विरोधकांनी राज्यांत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकजूट दाखवली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात दाखल होताच विरोधकांकडून ५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारमधील खातेवाटपाच्या धुसफुसीवरूनही विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच वंदे मातरम् सक्ती म्हणजे विकासावरून मुद्दा हिंदुत्वाकडे भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.