महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी कोरोना संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय सांगितला होता. परंतु, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही अर्थचक्राला झळ बसणार नाही याची महाराष्ट्र सरकार पूर्ण काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितले.
तसेच महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचाही पुरेसा पुरवठा होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लांटच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आपण आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी मोदींना केली.
तसेच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच अतिरिक्त ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही, पण रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा, असे ठाकरे म्हणाले.