घरमहाराष्ट्रMumbai Unlock : हॉटेल, दुकाने रात्री १२ पर्यंत खुली राहणार

Mumbai Unlock : हॉटेल, दुकाने रात्री १२ पर्यंत खुली राहणार

Subscribe

मुख्यमंत्र्यांची कोरोना कृती दलासोबत बैठक

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध आणखी सैल (Mumbai Unlock) करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातील उपाहारगृहे, दुकानाची वेळ वाढवली जाणार आहे. मुंबईतील हॉटेल, बारच्या वेळा पूर्ववत करण्यात येणार आहे. याशिवाय २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क खुली होणार आहेत.

अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले असून पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी वर्षा येथे कोरोना कृती दलाच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळीच्या तोंडावर कोरोना निर्बंध आणखी शिथिल करून जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्र्यांच्या बैठकीत दुकाने आणि उफारगृहांची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती. सध्या दुकाने आणि उपहाररगृहे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा आहे. ही वेळ आणखी वाढविण्यात येणार आहे.

आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करीत आहोत. उपाहारगृहे आणि दुकाने यांची वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

- Advertisement -

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे. तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला केली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे. याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असेही ठाकरे म्हणाले.

कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी आणि संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे,अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, मुंबई महापालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ खुसराव्ह, डॉ अजित देसाई, डॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

राज्यात दुकान, उपहारगृहांची वेळ वाढविण्यात येणार आहे. मुंबईत दुकाने, हॉटेल रात्री १२ पर्यँत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तर रेस्टॉरंट, बारमध्ये शेवटची ऑर्डर रात्री एक पर्यंत देता येईल.
राजेश टोपे
सार्वजनिक आरोग्य मंत्री

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -