घरमहाराष्ट्रकंत्राटी कामगारांसाठीच्या योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करेन; दरेकरांचा विश्वास

कंत्राटी कामगारांसाठीच्या योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करेन; दरेकरांचा विश्वास

Subscribe

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत शिवक्रांती कामगार संघटनेचा 25 वा मेळावा संपन्न

लोणावळा – शिवक्रांती कामगार संघटनेचा 25 वा कामगार मेळावा नुकताच लोणावळा येथे पार पडला. या कामगार मेळाव्याला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. तसेच जेव्हा जेव्हा कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल त्यावेळेला तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षणी सोबत असेन असा विश्वास उपस्थित कामगारांना दिला.

दरेकर यावेळी बोलताना म्हणाले की, मी विद्यार्थी दशेपासून आक्रमकपणे लढणारा कार्यकर्ता आहे. ज्या ठिकाणी अन्याय दिसतो त्या ठिकाणी कशाचीही परवा न करता लाथ मारून कामगारांना न्याय देण्याचे काम हा माझा स्वभाव विद्यार्थी चळवळीपासून आहे. प्रेमात खूप ताकद आहे. विजय पालेकर यांचे प्रेम अत्यंत मनापासून होते. मेळाव्याला यावे आमच्या कर्मचाऱ्यांना विश्वास द्यावा, त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. आणि मग जिथे प्रामाणिकपणा दिसतोय, जिथे जो कामगार नेता प्रामाणिकपणे आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांसाठी काम करतोय त्यावेळेला माझाही नाईलाज झाला आणि या ठिकाणी या संघटनेचे पालकत्व घेण्याची भूमिका अत्यंत मनापासून घेतली. जेव्हा जेव्हा कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल त्यावेळेला तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षणी आपल्या सोबत असेन हा 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो असेही दरेकर यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, द्वारकानाथ पवारांनी ज्या गिरणी कामगारांसाठी लढा उभारला त्या गिरणी कामगारांचा मेळावा आटोपून मी याठिकाणी आलो आहे. जे गिरणी कामगार मुंबईचे वैभव, मुंबईतील गिरण्या बंद पडल्या, या गिरण्या ज्यावेळी बंद पडल्या तेव्हा गिरणी कामगारांना घरे द्यायची असा निर्णय झाला. पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री असताना अतिशय चांगला निर्णय घेतला. ते कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तो विषय नाही. चांगल्याला आपण चांगलेच म्हटले पाहिजे. गिरणी कामगारांसाठी घोडपदेव येथे घरेही उभी राहिली. या घरांसाठी 10-12 लाख रुपये भरायचे होते ते भरण्यासाठी बँकाकडे गेले. परंतु मुंबईतील एकाही बँकेने त्यांना होकार दिला नाही. याचे कारण बँकेचाही दोष नाही. बँकेने सांगितले की तुमचा गिरणी कामगार तर 60 वर्षाच्या वर गेला आहे. या गिरणी कामगारला आम्ही कर्ज दिले तर परतफेड कोण करणार, परतफेडीची गॅरंटी कोण घेणार. त्यावेळी मी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटलो. त्यांना सांगितले की शासनाने निर्णय घेतलाय परंतु गिरणी कामगार घरे घेऊ शकत नाही कारण त्यांच्या फ्लॅटची किंमत 30-40 लाख आहे.

इच्छा असताना घर घेता येत नाही, कारण त्यांना कोण पैसे देत नाही. मी त्याठिकाणी शासनाला निर्णय करायला भाग पाडले की त्यांना सहकर्जदार घ्या आणि त्याठिकाणी त्यांचा फ्लॅट भाड्याने द्यायला परवानगी द्या. अशाप्रकारे 3850 लोकांना 10-12 लाख रुपये दिले. 150 ते 200 कोटी रुपये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दिले. गिरणी कामगारांबाबत मला कानावर आहे. माझे आजोबा गिरणीत होते. वडील एसटी कंडक्टर होते. दिवसरात्र एसटीमध्ये काम करत होते. त्यामुळे कामगारांच्या व्यथा मला त्याठिकाणी नीट माहित आहेत. त्यामुळे ज्यावेळेला कामगारांचा प्रश्न येतो तेव्हा मी भावनिक होतो. एसटी कामगारांचे आंदोलन झाले त्यावेळी मी दोन दिवस त्यांच्या सोबत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेलो. याचा अर्थ त्यांच्या संवेदना, व्यथा त्यांच्यातील झाल्याशिवाय कळत नाही आणि मग त्या एसटी कामगारांनाही न्याय द्यायला आपण भाग पाडले, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

दरेकर पुढे म्हणाले की, देशाचे दोन महत्वाचे घटक आहेत. पहिला शेतकरी आणि दुसरा कामगार. दोन्ही घटक जर सशक्त, ताकदवान असतील तर देशाचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. पंतप्रधान मोदी साहेबांनी या देशाचे नेतृत्व स्विकारल्यानंतर कष्टकरी वर्गाकडे लक्ष केले. गरीब कल्याणाच्या अनेक योजना आणल्या. त्याचपद्धतीने ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी केला. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर तीन महिन्यांनी दोन हजार वर्षाला सहा हजार शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी साहेबांनी केला. कामगार ज्यावेळेला निवृत्त होतो. त्यावेळेला त्याच्या भविष्याची व्यवस्था करणारी योजना केंद्र आणि राज्य सरकारला करता येते का? याची आग्रहाने सरकारकडे मागणी करू. सर्व पैसे सरकारचे नको. काही काँट्रीब्युशन मालक करतील, काही भाग कामगारांच्या कपातीतून जाईल आणि काही भाग सरकार त्यात टाकेल. त्यामुळे निवृत्तीच्या काळात ज्या विवंचना कामगारांना असतात त्याही सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार करेल. यासाठी मी पुढाकार घेईन, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.

तसेच माथाडी कामगारांना सरकारने भूखंड दिला. भूखंड दिला जबाबदारी संपली. भूखंड दिल्यावर माथाडीना पैसे कोणच देत नव्हते. इमारत बांधणार कशी? कारण माथाडीकडे फक्त बॅच, ना कागद ना पगाराची पावती त्यांना कोण पैसे देणार. मी डोके चालवले माथाडीची पतपेढी होती ती आमच्या जिल्हा बँकेची सभासद होती. मी सांगितले तुमच्या पतसंस्थेला कर्ज देतो तुम्ही पतसंस्थेने तुमच्या बॅच, कागदपत्रावर इमारत बांधायला पैसे द्या. इथेपण आपण 200 कोटी रुपये दिले. माथाडीची घरे त्याठिकाणी उभी राहिली.

कंत्राटी कामगार या विषयावर मी विधिमंडळात अनेक भाषणे केली आहेत. स्वतंत्र अशासकीय ठराव आणला होता. कंत्राटी कामगारांना आज कुठल्याही प्रकारची हमी नाही, योजना नाहीत. अशा वेळेला त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. हे सरकार आमचे आहे. गोरगरिबांचे सरकार आहे. शिंदे साहेब बघाल तर तुमच्यातले मुख्यमंत्री वाटतात. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू, ज्यांना पूर्ण प्रशासनाची, महाराष्ट्राच्या विकासाची कल्पना असणारे नेतृत्व आहे. ही जोडगोळी या महाराष्ट्रासाठी प्रामाणिक काम करते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, वेगवेगळ्या योजना केल्या तर कामगारांसाठीही सरकारने काम करावे यासाठी मी शिंदे-फडणवीस यांना भाग पाडीन आणि कंत्राटी कामगारांसाठीही नेमके काय करता येईल, त्यांचे भविष्य शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करूया. ज्या ज्या योजना आहेत त्या या कामगारांना कशा काय अंमलात आणता येतील या संदर्भातही शासन स्तरावर निश्चितपणे मी मांडेन, असा विश्वासही यावेळी आ. दरेकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -