मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाकडून राज्य सरकारला आवाहन करण्यात येत आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ५ जूनला आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे. या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असणार आहे. कृपया मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग भाजपने बंद करावेत असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
मराठा आरक्षणा प्रकरणात मराठा समाजाची दिशाभूल करु नये असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपने मराठाआरक्षण बाबत समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन आम्ही वारंवार करतोय. पण दिशाभूल हाच त्यांचा एकमेव अजेंडा दिसतो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, फेरविचार याचिकेसाठी ४ जून पर्यंतची मुदत आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाने खालील आदेश दिला आहे. सरन्यायाधिशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तींच्या खंडपिठाचा आदेश देण्यात आला आहे.
सरन्यायाधिशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तींच्या खंडपिठाचा आदेश…https://t.co/a4qBhC8hOO pic.twitter.com/WH0l0386bG
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 27, 2021
वस्तुस्थिती लक्षात घेता भाजप व चंद्रकांत पाटील यांना माझे पुनःश्च आवाहन आहे की, कृपया मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल ३१ मे पर्यंत अपेक्षित असून, त्यानंतर राज्य सरकार पुढील निर्णय घेईल. काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठाआरक्षण बाबत भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा दिखाऊ असून, या मुद्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे अशा आशयाचे ट्विट सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.